ग्रामसभा गायब, अवैध नळजोडण्यांचा आरोप:प्रशासनाच्या विरोधातच एल्गार, गटविकास अधिकारी व मजीप्राला निवेदन

येथून जवळच असलेल्या करतवाडी रेल्वे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या धामणा (बु.) गावातील शेकडो ग्रामस्थांनी गावातील विविध प्रलंबित प्रश्न, कथित अनियमितता, नियमित ग्रामसभा न घेतल्याच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. पंचायत समिती अकोटचे गटविकास अधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन सादर केले. गावातील समस्यांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या आरोपानुसार, २६ जानेवारी ते १ मे २०२६ या कालावधीत नियमानुसार होणाऱ्या महत्त्वाच्या ग्रामसभा घेण्यात आल्या नाहीत. या ग्रामसभांबाबत नागरिकांना पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. ग्रामसभा हे गावाच्या विकासाची दिशा ठरवणारे, ग्रामस्थांना प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ मानले जाते; मात्र त्या नियमितपणे घेतल्या जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. प्रशासनाने या सर्व विषयांची स्वतंत्र चौकशी करून कारवाईचा अहवाल जाहीर केला नाही, तर शेकडो ग्रामस्थांसह पंचायत समिती कार्यालयावर आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदनावर पंकज जुमडे, रोशन खेडकर, हेमंत गोरले, आदित्य आढे, दिनकर आढे, वाल्मीक बद्रे, कैलास गोरले यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासकीय अनास्थेविरोधात ग्रामस्थांचा आवाज ^आमच्या गावात ग्रामसभाच होत नाही. गावातील प्रलंबित प्रश्न मांडायचे कुठे व विकासकामांचा हिशोब मागायचा कुणाकडे? ग्रामसभा न घेणे म्हणजे ग्रामस्थांच्या घटनात्मक अधिकारांवर घाला घालण्याचा प्रकार आहे. – वाल्मीक बंदरे, ग्रामस्थ. ^अवैध नळजोडण्यांमुळे ग्रामस्थांंना पाणी मिळत नाही. महिलांना पाण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाने कार्यालयात बसून कागदोपत्री काम न करता प्रत्यक्ष गावात येऊन परिस्थिती पाहावी. – ललिता जुमडे व कैलास गोरले, ग्रामस्थ. ^गावात पथदिवे बंद असून नाल्या तुंबलेल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेचे कामही निकृष्ट केले आहे. पाणीपुरवठा, दिव्यांग निधी आणि शाळा दुरुस्तीबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा शेकडो ग्रामस्थ पंचायत समितीवर धडक मोर्चा काढतील. – पंकज जुमडे व पवन बंदरे, ग्रामस्थ. अवैध नळजोडण्यांमुळे टंचाई ग्रामसभेसोबतच धामणा पाणीपुरवठा योजनेत वित्तीय व प्रशासकीय अनियमिततेचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. चोहोट्टा बाजार येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये ४० ते ५० अवैध नळजोडण्या दिल्या आहेत. यामुळे मुख्य वाहिनीवरील पाण्याचा दाब कमी झाला असून धामणा (बु.) गावातील मूळ नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. याची मजीप्रामार्फत तांत्रिक चौकशी करून अवैध नळजोडण्या खंडित करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!