शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याच्या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे एक व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये “मोठे मोठे गार केले गंमतमध्ये” असा मजकूर शेअर केला आहे. या स्टेटसमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोही दिसत आहे. त्यामुळे या स्टेटसचा संबंध थेट ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीशी जोडला जात आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा शिंदे गटाचा दावा गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू होती. अखेर गुरुवारी ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गटाची भूमिका घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर शिंदे गटाकडून विजयाचे दावे केले जात आहेत. शिवसेनेचे आमदार परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी तर उघडपणे “ऑपरेशन टायगर महाराष्ट्रात यशस्वी झाले आहे. सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त करून शिवसेनेत प्रवेश केला आहे,” असा दावा केला. त्यांनी या खासदारांचे स्वागतही केले. दिल्लीतील बैठकीकडे लागले होते लक्ष या घडामोडींमुळे सकाळी दिल्लीत बोलावण्यात आलेल्या शिवसेना (UBT) खासदारांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पक्षाने सर्व खासदारांना बैठकीसाठी व्हीप जारी केला होता. मात्र, त्याआधीच सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याची माहिती समोर आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. सुषमा अंधारेंची ओमराजेंना भावनिक साद या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून केलेले ट्विटही चर्चेत आले. “ओम दादा, तुम्ही बैठकीला उपस्थित राहाल अशी अपेक्षा आहे. खासदार म्हणून नाही, तर आमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून आम्ही तुमच्यावर जीव लावलाय,” असे म्हणत त्यांनी भावनिक आवाहन केले होते. यामुळे ठाकरे गटाकडून शेवटपर्यंत खासदारांना सोबत ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसून आले. राऊतांच्या दाव्याने नवा वाद दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांना त्यांच्या वडिलांच्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील खटल्याचा निकाल त्यांच्या बाजूने लावून देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा गंभीर दावा केला. या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनीही न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेबाबत प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी केली. येथे वाचा संपूर्ण बातमी ‘संजय राऊतांच्या भाषेमुळेच पक्षाची वाट लागली’ दुसरीकडे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हा ठाकरे गटाचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले. मात्र, त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत “राऊत ज्या प्रकारची भाषा वापरतात, त्यातूनच शिवसेना (UBT) चा विनाश होत आहे,” असा आरोप केला. वाचा संपूर्ण बातमी उज्ज्वल निकमांनी मांडला कायदेशीर पेच राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात एक महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा उपस्थित केला. सहा खासदारांनी स्वतंत्र गटाची मागणी केली असली तरी त्यांनी अद्याप पक्ष सोडल्याचे जाहीर केलेले नाही. त्यामुळे ते अद्यापही तांत्रिकदृष्ट्या शिवसेना (UBT) चे सदस्य मानले जाऊ शकतात, असे निकम यांनी स्पष्ट केले. यासोबतच या खासदारांवर कोणाचा व्हीप लागू होणार, हा मोठा कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. वाचा संपूर्ण बातमी उदय सामंतांच्या स्टेटसची चर्चा का? अशा वातावरणात उदय सामंत यांचे “मोठे मोठे गार केले गंमतमध्ये” हे स्टेटस समोर आल्याने त्याची राजकीय चर्चा रंगली आहे. शिंदे गटाने 2022 मध्ये 40 आमदारांसह केलेल्या बंडानंतर आता ठाकरे गटातील खासदारांनाही आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळाल्याचा संदेश या स्टेटसमधून देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सामंत यांनी या स्टेटसबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसल्याने त्यामागील नेमका अर्थ अद्याप स्पष्ट झालेला नाही. आता सर्वांचे लक्ष लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडे लागले आहे. सहा खासदारांच्या स्वतंत्र गटाला मान्यता मिळते का, त्यानंतर ते अधिकृतपणे शिंदे गटात सामील होतात का आणि ठाकरे गट या विरोधात कोणती कायदेशीर पावले उचलतो, यावर महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील समीकरणे ठरणार आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांचे एक स्टेटस मात्र सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात तुफान चर्चेचा विषय ठरले आहे.
