राज्यात महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही निकाल समोर आला आणि महायुतीतील अंतर्गत मतभेद अधिक स्पष्ट दिसू लागले. साताऱ्यात सत्तास्थापनेच्या घडामोडीत भाजपला बाजूला ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादीने पुढाकार घेतल्याची चर्चा रंगली. या पार्श्वभूमीवर सांगलीतील राजकारणही तापले. मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपवर टीका करत एका लुगड्याने कोणी म्हातारी होत नाही, असे म्हणत सोयीस्कर भूमिका घेतल्याचा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्याला आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, शंभूराजे देसाई हे त्यांचे चांगले मित्र आहेत; मात्र सांगली महापालिकेत यापूर्वी भाजपचे संख्याबळ जास्त होते आणि शिवसेनेचा एकही सदस्य नव्हता. शिवसेनेची ताकद वाढल्यानंतर युतीचा निर्णय घेतला गेला. शिवसेनेने दिलेल्या उमेदवारांमुळे भाजपचे काही उमेदवार पडले. तुमच्या मतांमुळे आमचे उमेदवार पराभूत झाले, असे म्हणत देसाईंनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. या निवडणुकीत मतांचे विभाजन कसे झाले, याची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पाटील पुढे म्हणाले की, अजित दादांच्या नगरसेवकांकडून पाठिंब्याचा निरोप आला. आम्ही 16 घ्यायचे की तुमचे दोन घ्यायचे, असा प्रश्न होता. आम्ही 16 स्वीकारले. तुमच्यामधून आमचे दोन गेले, त्याला आम्ही काय करायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कुणीतरी कुणालातरी फसवले आहे, असा सूचक उल्लेख करत त्यांनी सांगलीतील सत्तासमीकरण कसे बदलले, यावर प्रकाश टाकला. 39 आणि 16 अशी संख्या झाल्यामुळे उपमहापौरपद देण्यात आले, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेची भूमिका ठरवणारे भाजप कोण? दुसरीकडे, शंभूराज देसाई यांनी निवडणुकीपूर्वी मित्रपक्षांना डावलून नंतर सत्ता स्थापनेच्या वेळी सोबत असल्याचे सांगणे ही भाजपची सोयीस्कर पद्धत असल्याची टीका केली होती. शिवसेनेची भूमिका ठरवणारे भाजप कोण? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषदेत पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो आदेश येईल, त्यानुसार पुढील भूमिका ठरेल, असे देसाईंनी सांगलीत माध्यमांशी बोलताना म्हटले. राष्ट्रवादीतील घडामोडींवर भाष्य टाळण्याचा प्रयत्न या वादाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी आणखी एका संवेदनशील मुद्द्यावर भाष्य केले. रोहित पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाबद्दल संशय व्यक्त केल्याच्या चर्चेवर ते म्हणाले, या देशात कोणालाही काहीही बोलण्याची मुभा आहे. माध्यमांसमोर बोलून उपयोग नाही; त्यांनी एजन्सीकडे तक्रार करावी आणि मुळापर्यंत जावे. समोर माईक दिसला की स्फुरण चढते, असे म्हणत त्यांनी रोहित पवारांना सल्ला दिला. पाटील यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, अजितदादा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत बाबींमध्ये पत्रकारांनी किंवा इतरांनी पडू नये. त्यांचं त्यांना करू द्यावं, असे ते म्हणाले. या विधानातून त्यांनी राष्ट्रवादीतील घडामोडींवर भाष्य टाळण्याचा प्रयत्न केला, तरी राजकीय वातावरणात या वक्तव्याची चर्चा सुरू झाली. महायुतीतील अंतर्गत तणाव उघड महापालिका आणि जिल्हा परिषद निकालानंतर निर्माण झालेल्या सत्तासमीकरणांनी महायुतीतील अंतर्गत तणाव उघड केला आहे. सांगली आणि साताऱ्यातील सत्तास्थापनेच्या चर्चांनी मित्रपक्षांमध्ये परस्पर संशय वाढल्याचे चित्र दिसते. एका बाजूला देसाईंची टीका आणि दुसऱ्या बाजूला पाटलांचे प्रत्युत्तर यामुळे स्थानिक पातळीवरील राजकारण अधिक तापले आहे. पुढे या वादाचे रूपांतर निर्णयांत होते का, आणि महायुतीतील मतभेद कितपत निवळतात, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.