देवस्थान भूमी संरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. शासनाने इनाम निर्मूलन कायद्याचे प्रारूप स्थगित करणे, हा हिंदूंच्या संघटित शक्तीचा मोठा विजय असून, पुढील लढा मंदिरांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यातून मुक्त करण्याचा असेल आणि मंदिर भूमी बळकावणाऱ्यांच्या विरोधात ‘अँटी-लँड ग्रॅबिंग’ कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार, असा निर्धार या परिषदेत व्यक्त करण्यात आला. मंदिर भूमी बळकावणाऱ्यांच्या विरोधात ‘अँटी-लँड ग्रॅबिंग’ कायद्याची आवश्यकता आहे, असे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक तसेच राष्ट्रीय मंदिर महासंघाचे संघटक सुनील घनवट म्हणाले. परिषदेला हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक तसेच राष्ट्रीय मंदिर महासंघाचे संघटक सुनील घनवट यांच्यासह अकोला व विदर्भातील विविध मंदिरांचे १५० विश्वस्त उपस्थित होते. हिंदू मंदिर विश्वस्तांनी संघटित झाल्यास देशातील ४ लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील, असे सुनील घनवट म्हणाले. मंदिर महासंघाच्या स्थापनेपूर्वी प्रत्येक मंदिर केवळ स्वतःपुरताच विचार करत होते. मात्र, आज मंदिर संस्कृतीवर आघात झाल्यावर सर्व मंदिर विश्वस्त रस्त्यावर उतरत आहेत. याचाच अर्थ “अभी देश बदल रहा है, हिंदू राष्ट्र की ओर बढ रहा है’. कोणत्याही एका मंदिराची समस्या ही केवळ त्या मंदिरापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण हिंदू समाजाची समस्या आहे, या भावनेने आपण लढलो. जर आपण हेच बळ पुढे कायम ठेवले, तर एक दिवस केंद्र सरकारला देशातील ४ लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची घोषणा करावीच लागेल,” असा विश्वास घनवट यांनी व्यक्त केला. या प्रसंगी श्री चंडिका देवी संस्थानचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, स्वयंभू महादेव अंत्रीचे अध्यक्ष अरविंद देठे, हनुमान मंदिराचे विश्वस्त प्रमोद अग्निहोत्री, मूर्तिजापूर येथील मंदिर महासंघाचे दिनकर ठाकरे आदी उपस्थित होते, असे महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदू जनजागृती समितीचे अमोल वानखडे यांनी कळवले आहे. हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर यांनी परिषदेची भूमिका मांडली. त्यांनी महाराष्ट्र मंदिर महासंघाने आतापर्यंत केलेल्या कार्याचा आणि मिळालेल्या ऐतिहासिक यशाचा आढावा घेतला. मंदिरे ही केवळ धार्मिक विधींची जागा नसून ती “सनातन धर्म प्रचाराची’ आणि हिंदू संस्कृतीच्या रक्षणाची मुख्य केंद्रे कशी बनू शकतील, याविषयी त्यांनी उपस्थित विश्वस्तांना विस्तृत माहिती पिसोळकर यांनी दिली. वक्फविरोधात पुढील लढा सुनील घनवट यांनी जाहीर केले की, मंदिर महासंघाचा पुढचा मोठा लढा हा मंदिरांच्या ज्या जमिनी वक्फ बोर्डाने बेकायदेशीरपणे बळकावल्या आहेत, त्या सर्व जमिनी मुक्त करून पुन्हा देवस्थानांच्या ताब्यात मिळवून देण्याचा असणार आहे.
