शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी बुधवारी १७ जून रोजी राजमाता जिजाऊंच्या चरणी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची प्रत ठेवली. सरकारला शेतकऱ्यांच्या वेदना समजाव्यात आणि न्याय देण्याची सद्बुद्धी मिळावी, असे साकडे यावेळी शेतकऱ्यांनी घातले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कर्जमाफीच्या शासन निर्णयामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. जिल्ह्यासह अनेक भागांत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी नोंदली गेली होती. शासनाने मदतही जाहीर केली होती. मुख्यमंत्र्यांनी पीक विम्याची घोषणा केली खरी. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही रक्कम जमा झालेली नाही. असा आरोप करत शेतकरी बुधवारी राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या राजवाड्यात एकत्र येत राजमाता जिजाऊंना अभिवादन केले. त्या नंतर त्यांनी यावेळी राजमाता जिजाऊंच्या चरणी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची प्रत ठेवून सरकारला शेतकऱ्यांच्या वेदना समजाव्यात आणि न्याय देण्याची सद्बुद्धी मिळावी, असे साकडे घातले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने वारंवार मोडीत निघत आहेत. कर्जमाफी, पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या प्रश्नावर शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक होत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. सरकारने कर्जमाफीच्या निर्णयात तत्काळ दुरुस्ती करून सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा द्यावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. तसेच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी शेतकरी योद्धा कृती समिती, क्रांतिकारी शेतकरी संघटना, लोकजागर परिवार तसेच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
