पीक विशिष्ट उत्पादन मोहिम व विविध कृषी योजनांबाबत आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत झाली. शासनाच्या राष्ट्रीय खाद्य तेल अभियान- तेलबिया, कापूस उत्पादकता अभियान, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, कृषी समृद्धी योजना या योजना शेती क्षेत्राच्या व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यांची माहिती सर्वदूर पोहोचवून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. खाद्यतेल अभियानात अकोला जिल्ह्यात सोयाबीन व भुईमूग पिकांची निवड करण्यात आली आहे. पीक विशिष्ट उत्पादन मोहिमेच्या माध्यमातून विविध अभियान व योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्याचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. योजनेची माहिती प्रसिद्धी व यशोगाथांच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचावी. लक्ष्यांकानुसार नियोजित कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत. या माध्यमातून कृषिपूरक उद्योगांना सर्वदूर चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, कृषी उपसंचालक हरिश देशमुख यांच्यासह सहकार विभाग, लीड बँकेचे प्रतिनिधी, प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते. कडधान्य आत्मनिर्भर अभियानात एकूण ६२० हे. वर तूर, मूग व उडीद पिकासाठी सलग गट प्रात्यक्षिके अपेक्षित आहेत. या तिन्ही पिकांचे १ हजार ५४० क्विं. (५ वर्षांच्या आतील) प्रमाणित बियाणे वितरण अपेक्षित आहे. ५ वर्षांच्या वरील, परंतु १० वर्षांच्या आतील ३ हजार १२० क्विं. प्रमाणित बियाणे वितरण अपेक्षित आहे. या योजनांची माहिती व लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. डॉ. इंगळे यांनी सादरीकरण केले. असा आहे लक्ष्यांक कापूस उत्पादकता अभियानात जिल्ह्यात ६ कोटी ३१ लाख ९२ हजार रु. आर्थिक लक्ष्यांक आहे. सघन लागवड पद्धतीवर विशेष प्रति हे. १८५०० रुपये अनुदान देय आहे. त्याशिवाय बायोबार, कॉटन श्रेडर, प्रशिक्षण आदी बाबींचा समावेश आहे. कृषी समृद्धी योजनेत पायाभूत सुविधांची उभारणी, उत्पादकता वाढ, आर्थिक वृद्धी अपेक्षित आहे. चिया लागवडीचा ३५००, गोदाम प्रकल्पाचा १८, अभ्यास दौऱ्याचा ३५०, बेड मेकर यंत्राचा ३०२, स्पायरल सेपरेटरचा १६२५ व टोकन यंत्राचा ७०० असा ६४९५ लाभार्थी लक्ष्यांक आहे.
