ठाकरेंची साथ सोडताच समर्थकांचीही पाठ?:ओमराजेंना सोशल मीडियावर दणका; अवघ्या दोन दिवसांत 15 हजार फॉलोअर्स घटल्याची चर्चा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या सहा खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर आणि शिंदे गटासोबत जाण्याच्या चर्चांमुळे आता त्यांना सोशल मीडियावरही त्याचा फटका बसल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांत 15 हजार फॉलोअर्स घटल्याचा दावा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून अनेक समर्थकांनी त्यांना अनफॉलो करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. विविध सोशल मीडिया ट्रॅकिंग आकडेवारीचा हवाला देत, गेल्या दोन दिवसांत सुमारे 15 हजार फॉलोअर्स कमी झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या आकडेवारीची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फॉलोअर्सची संख्या सातत्याने बदलत असते, त्यामुळे नेमकी घट किती झाली याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. पक्षांतराच्या चर्चेनंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर हे सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांचे व्हिडिओ, रील्स आणि विविध राजकीय पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. मात्र, ठाकरे गटातील संभाव्य फुटीनंतर त्यांच्या पोस्टखाली मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही समर्थकांनी नाराजी व्यक्त केली असून, तर काहींनी त्यांची भूमिका ऐकून घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. 20 जूनला भूमिका स्पष्ट करणार दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी अद्याप अधिकृतपणे आपली सविस्तर भूमिका जाहीर केलेली नाही. 20 जून रोजी सर्व घडामोडींवर भाष्य करणार असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांनी नेमका कोणता निर्णय घेतला, पक्ष सोडण्यामागील कारणे काय आहेत आणि पुढील राजकीय वाटचाल कशी असेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे. ठाकरे गटासाठी मोठा धक्का शिवसेना (उबाठा)च्या नऊ लोकसभा खासदारांपैकी सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाबाबत पत्र दिल्याची माहिती समोर आली असून, ठाकरे गटाने त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून “ऑपरेशन टायगर” यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावरील नाराजी मतदानात बदलतेच असे नाही राजकीय विश्लेषकांच्या मते, सोशल मीडियावरील प्रतिक्रिया आणि प्रत्यक्ष जनमत यात अनेकदा फरक असतो. एखाद्या नेत्याला मोठ्या प्रमाणावर अनफॉलो केले जाणे ही नाराजीची एक खूण असू शकते, मात्र त्यावरून भविष्यातील निवडणूक निकालांचा अंदाज बांधणे योग्य ठरत नाही. तरीही, ठाकरे गटातील फुटीनंतर ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये झाल्याचे सांगितले जाणारे बदल हे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. आता 20 जून रोजी ते नेमकी कोणती भूमिका मांडतात आणि या संपूर्ण प्रकरणावर काय स्पष्टीकरण देतात, याकडे धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. वाचा ओमराजे निंबाळकर यांनी दिव्य मराठीला दिलेली मुलाखत दिव्य मराठी मुलाखत:प्रश्न पक्षांतराचा निर्णय का?, निष्ठा आहे पण लाेकांची कामे करता येत नसतील तर काय उपयाेग?- ओमराजे
समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील, तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता दुसरा पर्यायच उरत नाही, अशा शब्दांत उद्धवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याबाबत आपली परखड भूमिका मांडली. उद्धवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओमराजे यांनी पहिलीच मुलाखत ‘दिव्य मराठी’ला दिली. येथे वाचा संपूर्ण मुलाखत

Leave a Comment

error: Content is protected !!