नांदगाव पेठ नांदगाव पेठ ग्रामपंचायत २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. २०११ च्या जनगणनेच्या आधारे तसेच २०१५ आणि २०२०-२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील आरक्षणाचा विचार करून विविध प्रभागांतील सदस्य पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण ६ प्रभागांमधील १७ सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.), सर्वसाधारण तसेच महिला आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. महिला आरक्षणालाही यावेळी विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. आरक्षण सोडतीनंतर इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून विविध राजकीय गट, पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरक्षण सोडत प्रसंगी अध्यासी अधिकारी विजय वाघमारे, तलाठी आदेश गजभिये, धीरज बोबडे, राजेश दंदे, ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोन्डे यांच्यासह माजी लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिमुकलीच्या हाताने आरक्षणाची सोडत काढण्यात आली
