‘प्रेम आंधळं असतं’ असं म्हणतात, पण समाज माध्यमाच्या युगात हेच प्रेम कधी कोणते वळण घेईल याचा नेम राहिलेला नाही. सांगली जिल्ह्यातील एका ३६ वर्षीय २ मुलांच्या मातेचा आणि पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील २० वर्षीय तरुणाचा समाज माध्यमावर सुरू झालेले प्रेमप्रकरण थेट मोबाईल टॉवरवर पोहोचल्याची घटना समोर आली. गुरुवारी सकाळी भाळवणी गावात तब्बल २ तास रंगलेल्या या शोले स्टाईल ड्राम्याने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. मात्र, पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक रेखा घनवट यांनी दाखवलेले अचाट धाडस आणि संयमामुळे एक मोठा अनर्थ टळला. संबंधित ३६ वर्षीय महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत. गेल्या ३-४ वर्षांपासून ती पती आणि मुलांपासून वेगळी राहत होती. दरम्यान, समाज माध्यमावर तिची ओळख भाळवणी येथील २० वर्षीय तरुणाशी झाली आणि दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. २- ३ महिने एकत्र राहिल्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागल्याने महिलेने तरुणाविरोधात पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला, ज्यामध्ये तरुणाला अटकही झाली. काही दिवसांनी कोर्टाने तरुणाला जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतरही हे दोघे पुन्हा एकत्र राहू लागले होते. परंतु, पुन्हा काहीतरी बिनसल्याने तरुणाने “मला आता तुझ्यासोबत एकत्र राहायचे नाही,” असे स्पष्ट सांगितले. सकाळी तिने थेट गावातील एक उंच मोबाईल टॉवर गाठला आणि ती वर चढून तरुणाला बोलवण्याची मागणी करू लागली. टॉवरवर चढून बसल्यानंतर या महिलेने स्वतःच ११२ या पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून पोलिसांना पाचारण केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक रेखा घनवट यांनी स्वतः कमान सांभाळली. त्यांनी जीवाची पर्वा न करता स्वतः टॉवरवर चढून त्या महिलेशी संवाद साधला, पो.नि. घनवट व त्यांच्या टीमने अत्यंत सुरक्षितपणे त्या महिलेला टॉवरवरून खाली उतरवले. या धाडसाबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पीआय घनवटची कामगिरी
