शेतकऱ्यांवर दुहेरी संकट:भीमा नदीकाठच्या गावांत वीजपुरवठा‎ खंडित; उभ्या पिकांची होतेय होरप‌‌ळ‎

यंदा उन्हाचा तडाखा तीव्र असतानाच पंढरपूर तालुक्यातील महावितरणच्या अघोषित भारनियमनामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तालुक्यातील इसाबावी, चिंचोली भोसे, आणि गुरसाळे या भागात भीमा नदीच्या किनाऱ्यावर पाणी उपलब्ध असूनही, वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे उभ्या पिकांची मोठी होरपळ सुरू आहे. ‘पाणी पायथ्याला आणि उन्हाचा आगडोंब माथ्याला’ अशी अत्यंत बिकट स्थिती सध्या या भागात निर्माण झाली आहे. नदीकाठच्या भागात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत पिकांना नियमित पाण्याची नितांत गरज असते. मात्र, महावितरणने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरू केले आहे. वारंवार वीज खंडित होणे किंवा कमी दाबाने वीज मिळणे यामुळे शेतकऱ्यांना नदीत पाणी असूनही ते पिकांपर्यंत पोहोचवता येत नाही. परिणामी, शेतकऱ्यांची हुकमी नगदी पिके असलेली ऊस आणि इतर पिके डोळ्यांदेखत वाळून चालली आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी लाखो रुपये खर्च करून उभी केलेली पिके ऐन उन्हाळ्यात करपून जात असल्याने शेतकरी कमालीचे अडचणीत आले आहेत. भीमा नदीच्या किनाऱ्यावर असूनही विजेअभावी शेतीचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्रतिनिधी | पांडे पिके जळू लागल्याने शेती पंपांना सुरळीत आणि उच्च दाबाने वीज मिळावी, म्हणून करमाळा तालुक्यातील शेतकरी भर उन्हातान्हात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत. कधी महावितरण कार्यालयावर धडक, कधी रास्ता रोको, तर कधी मशाल मोर्चा काढून शेतकऱ्यांनी आपला आवाज उठवला; मात्र लोकशाही मार्गाने घेतलेल्या या आक्षेपांना महावितरणने केराची टोपली दाखवली. आता करमाळ्यातील बळीराजाचा संयम सुटत चालला असून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे सत्ताधारी नेतेमंडळी मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रणनीतीच मश्गुल दिसत आहेत. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे आणि योग्य नियोजनाच्या अभावामुळे अनेक भागांमध्ये शेती पंपांना कमी दाबाने वीज मिळत असून उभी पिके जळण्याच्या मार्गावर आली आहेत. त्यामुळे “आपली समस्या घेऊन नेमके कोणाकडे जायचे?” असा मोठा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. प्रतिनिधी | पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील विजेचे भारनियमन आणि वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दि. २० जून रोजी आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आमदार पाटील यांनी आवाहन केले . सध्या शेतात उभी असलेली पिके डोळ्यादेखत जळून खाक होत आहेत. तरी देखील शेतकऱ्यांच्या नदीकाठ व शेती पंपांची वीज कापली जात आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि महावितरणचे धोरण यामुळे शेतकरी कोलमडला आहे. पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र बनत आहे. प्रशासनाने सार्वजनिक जल स्थळ परिसरातील वीजपुरवठा खंडीत केला आहे. एकाच प्रश्नासाठी चार-चार वेळा आंदोलन . बोरगाव येथील शेतकऱ्यांनी शेतीपंपांना सुरळीत वीज मिळावी यासाठी पोटेगाव सबस्टेशनवर तब्बल तीन वेळा आणि करमाळा महावितरण कार्यालयात एक वेळा आंदोलन केले. . मांगी, वडगाव दक्षिण, हिवरवाडी, रावगाव व भोसे येथील शेतकऱ्यांनी मांगी सबस्टेशनवर आंदोलन करून करमाळा महावितरण कार्यालयात तीन ते चार वेळा निवेदने दिली. . सावडी येथील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर मशाल आंदोलन केले. युवा सेनेचे शंभूराजे फरतडे आणि पंचायत समिती सदस्य भरत आवताडे यांच्या नेतृत्वाखाली कोळगाव सबस्टेशनवर तीन वेळा निवेदन देत एकदा रास्ता रोको आंदोलन केले. . पोथरे आणि करंजे येथील शेतकऱ्यांनीही करमाळा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. तरीही महावितरणच्या अधिकाऱ्यांना मात्र ऐन उन्हाळ्यात ही घाम फुटला नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!