राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करमाळा येथे आज सर्वपक्षीयांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय घंटानाद आंदोलन करण्यात आले. “नको अटी, नको शर्ती; आम्हाला हवी सरसकट कर्जमुक्ती” अशी घोषणा देत शेतकरी आणि विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. या घंटानाद आंदोलनाला करमाळा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, भीम दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ कांबळे, रासपचे अंगद देवकते, समाधान फरतडे, सुजित बागल यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. घंटानाद आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ घोषणाबाजीने वातावरण दणाणून गेले होते. शेकडो शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. ^करमाळा तालुक्यातील राजकीय नेतृत्व केवळ स्वतःपुरते राजकारण करत असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठामपणे उभे राहणारे नेतृत्व आज दिसत नाही. – दशरथ कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य ^मांगी तलावाचे पाणी जामखेड तालुक्याकडे वळविण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही. प्रसंगी संघर्ष करू, रक्त सांडू मात्र करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी इतरत्र जाऊ देणार नाही. – संतोष वारे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी . शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. . विमा कंपन्यांनी तातडीने विमा भरपाई द्यावी व बोगस विमा कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. . सीना नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचनामे होऊनही न मिळालेली मदत त्वरित द्यावी. . शेती मशागत व पेरणीसाठी शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. . मांगी तलावातील पाणी जामखेडला देण्याचा आदेश रद्द करा. . शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. . पिकांना पाणी देण्यासाठी दररोज किमान आठ तास नियमित व अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा.
