‘उबाठा’ गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या वाटेवर; म्हणूनच खासदार दूर गेले:जनतेच्या न्यायालयात शिंदेंचीच शिवसेना खरी- नवनाथ बन

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपचा एकही आमदार त्यांच्या गळाला लागला नाही. त्यामुळे हा पैसा किंवा पदाचा संघर्ष नसून विचारांचा संघर्ष आहे.काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या दिशेने उबाठा गट वाटचाल करत असल्याने अनेक लोकांनी त्यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांना टक्केवारी नव्हे तर जनतेच्या मतांची टक्केवारी महत्त्वाची वाटते, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, शिवसेना कुणाची याचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेने आधीच दिलेला आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असली तरी जनतेच्या न्यायालयात मूळ शिवसेना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील, हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना असल्याचा कौल मतदारांनी दिला आहे. विधानसभा निवडणूक असो किंवा त्यानंतरच्या राजकीय घडामोडी, जनतेने दोनदा शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे अमित शहा यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवरही जनतेने मतांच्या माध्यमातून शिक्का मारला असून संजय राऊत यांनी विनाकारण रडगाणं गाणं बंद करावं. राऊतांनी आत्मपरीक्षण करावे नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत आणि त्यांचा पक्ष रोज राहुल गांधी व काँग्रेसच्या सुरात सूर मिसळत आहे. हिंदुत्वाचा वारसा सोडून काँग्रेसच्या विचारसरणीसमोर नतमस्तक झालेल्यांनी भाजपला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. अमित शहा हे हिंदुत्व आणि राष्ट्रहितासाठी काम करतात, तर उबाठा गट काँग्रेसच्या राजकारणाचा विस्तार बनला आहे. त्यामुळे इतरांवर टीका करण्याऐवजी संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. उबाठाचे वरातीमागून घोडे नवनाथ बन म्हणाले की, ज्या खासदारांना वेळ दिला नाही, ज्यांचे फोन घेतले नाहीत आणि ज्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद होते, ते खासदार आता परत येणार नाहीत. वेळ निघून गेली असून खासदारांनी आपला निर्णय घेतला आहे. जेव्हा कार्यकर्ते, आमदार आणि खासदार भेटीसाठी विनंती करत होते तेव्हा त्यांना वेळ देण्यात आला नाही. आता राजकीय नुकसान झाल्यानंतर सुरू झालेले दौरे म्हणजे वरातीमागून घोडे असा प्रकार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!