संपूर्ण राज्याला असलेली मान्सूनची प्रतिक्षा आज अखेर संपली. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी सकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरू झाली असून अनेक भागांत काळ्या ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबईतील हवेत अचानक गारवा निर्माण झाला असून, गेले अनेक दिवस असह्य उकाड्याने आणि दमट वातावरणाने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने 20 जूननंतर राज्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज दिला होता, त्यानुसारच आज 21 जून रोजी मुंबईत पावसाचे आगमन झाले आहे. हवामान विभागाने 20 जूननंतर राज्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवला होता. त्या अंदाजाला साजेसा बदल आज मुंबईत दिसून आला. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, काही दिवसांपासून संथावलेला मान्सून 23 जूनपासून पुन्हा गती घेण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी सध्या हवामान पोषक ठरत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राने सोमवारपासून मुंबई आणि ठाणे परिसरासाठी मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनीही सोशल मीडियावरून दिलेल्या माहितीत सोमवारपासून मुंबई आणि पुण्यात चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विविध हवामान मॉडेल्समध्येही पुढील काही दिवसांत पावसाची हजेरी वाढण्याचे संकेत मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. पुणेकरांची पावसाकडे आशाळभूत नजर दुसरीकडे, पुणे शहरात मात्र पावसाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. जूनचा तिसरा आठवडा उलटूनही अपेक्षित पाऊस न पडल्याने पुणेकरांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. शनिवारी पुण्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा 6.3 अंशांनी वाढून 36.7 अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिकच जाणवत होता. मंगळवारपासून पुण्यात पावसाची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत पुण्यात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून 23 ते 25 जूनदरम्यान मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या आशा आता या पावसावर केंद्रित झाल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात मान्सूनची मोठी दिरंगाई उत्तर महाराष्ट्रात मात्र परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. जून अखेरच्या टप्प्यातही मान्सूनने समाधानकारक हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांमध्ये 20 जूनपर्यंत तब्बल 90 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. या भागासाठी अपेक्षित पाऊस 455.8 मिमी असताना प्रत्यक्षात केवळ 46.1 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे तब्बल 409.7 मिमी, म्हणजेच जवळपास 410 मिमी इतकी मोठी तूट निर्माण झाली आहे. या कमालीच्या अपुऱ्या पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतीपिकांवर संकटाचे सावट गडद झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि अस्वस्थता वाढली आहे.
