केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्र्यांना थेट ईमेल पाठवून आणि वृत्तपत्रांमधून सातत्याने आवाज उठवूनही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ बु. ते लोहारा येथील शेत रस्त्यांचा प्रश्न रेंगाळलेलाच आहे. मान्सून जूनच्या अखेरीस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांची रस्त्याअभावी गैरसोय होणार आहे. प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी रस्त्याची समस्या भेडसावते. शेतकऱ्यांना शेतमाल, अवजारे, जनावरे, वाहने शेतात ने आण करणे सोईचे होत नाही. शेतरस्त्यांवरून वादही होतात. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शेतरस्ते अडथळामुक्त व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून देण्यात आला होता. त्यानुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान बाळापूर तालुक्यातील उरळ येथील शाभ घोडासकर यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण शिवराजसिंह चौहान यांना ई-मेल पाठवत शेतरस्त्याच्या दुरावस्था नमूद केली आहे, असे आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष गोपाल पोहरे यांचे म्हणणे आहे. मात्र त्यानंतरही हालचाली होतात दिसत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रस्त्याची समस्या तातडीने न सुटल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पोहरे यांनी दिला आहे. प्रशासनाकडून आदेशाची पायमल्ली काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील शेत रस्ते अडथळामुक्त करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. मात्र, स्थानिक पातळीवर या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. उरळ बु. येथील शेतकरी श्याम घोडस्कार, आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल पोहरे यांनी थेट केंद्रीय पातळीवर दाद मागूनही यंत्रणा हलण्यास तयार नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेत रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे कृषी उत्पादकतेला धोका निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांना पाठलेल्या ई-मेलमध्ये नमूद केले आहे. अकोला जिल्ह्यातील उरळ ख. ते लोहारा या शेतरस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. हा रस्ता या भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक आहे. मात्र गत अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. जीव, उपजीविका आणि कृषी उत्पादकतेला गंभीर धोका निर्माण करत आहे. रस्त्याला खोल खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर जवळजवळ चालणेही अशक्य होते. अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण होते.
