कायदा हातात न घेता, कायद्याने हात बळकट करा याचाच आदर्श वस्तूपाठ अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील ग्रामस्थांनी घालून दिला आहे. पोलिस ठाण्याची पायरी न चढता, केवळ जागरूकता, सामाजिक एकजूट आणि सकारात्मक संवादाच्या जोरावर लिंगदेवमध्ये होणारा संभाव्य बालविवाह रोखण्यात यश आले आहे. लिंगदेव येथील एका कुटुंबात अल्पवयीन मुलीचा विवाह ठरल्याची माहिती पोलिस पाटील मंगल पवार यांना मिळाली. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन कायदेशीर खटला उभा करण्याऐवजी गावातच हा प्रश्न सामोपचाराने सोडवण्याचे ठरवले. त्यांनी सरपंच अमित घोमल, तंटामुक्ती अध्यक्ष लहानू फापाळे, गणेश पवार, आरोग्य सेविका माधुरी उगले, आशा सेविका सुपरवायझर मनीषा जाधव, सुचिता आढाव आणि सामाजिक कार्यकर्ते परशुराम महाराज कानवडे यांच्याशी संपर्क साधून वधू व वर पक्षाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गावकऱ्यांचा सकारात्मक आणि मुलीच्या भल्याचा हेतू लक्षात घेऊन दोन्ही कुटुंबांनी हा विवाह तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच आणि तिच्या संमतीने लग्न करू, अशी लेखी कबुली कुटुंबाने दिली. विशेष म्हणजे, या मुलीस पुढील शिक्षणासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही संपूर्ण गावाने दिली आहे. पोलिसांची कोणतीही बळजबरी न वापरता सामाजिक एकजुटीतून हा संवेदनशील प्रश्न सोडवल्याबद्दल लिंगदेव गावाचे सर्वत्र कौतुक होत असून, बालविवाहासारखी कुप्रथा नष्ट करण्यासाठी प्रत्येक गावाने हाच आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा, तो गुन्हा घडूच न देणे ही खरी सामाजिक जबाबदारी आहे. लिंगदेवच्या ग्रामस्थांनी आणि महिला सहकाऱ्यांनी दाखवलेली सजगता कौतुकास्पद आहे. संवाद आणि योग्य समुपदेशनातून मोठे सामाजिक बदल घडवता येतात, हे या घटनेने सिद्ध केले, असे पोलिस पाटील मंगल पवार यांनी सांगितले. मुलीच्या आरोग्याची काळजी पटवून दिली सुरुवातीला लग्न जमवलेल्या कुटुंबांमध्ये काहीशी गोंधळलेली अवस्था निर्माण झाली होती. मात्र, ग्रामस्थांनी आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने त्यांचे समुपदेशन केले. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ मधील कडक तरतुदी, होणारी जेल आणि दंडाची माहिती दिली. त्याचसोबत अल्पवयात लग्न झाल्यास मुलीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आणि तिच्या शिक्षणाची होणारी हानी उदाहरणासह पटवून दिली. “मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब प्रगतीपथावर जाते, हा विचार कुटुंबाच्या समजावून सांगण्यात गावकऱ्यांना यश आले.
