सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईला जाणारे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाऐवजी आता नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. हा बदल उन्हाळी सत्राच्या वेळापत्रकात करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे या विमानतळावरून मुंबई गाठण्यासाठी सुमारे २ तास लागण्याची शक्यता आहे. इंडिगोचे मुंबईहून सकाळी ६.१० वाजता निघणारे विमान छत्रपती संभाजीनगरला सकाळी ७.२० वाजता पोहोचते. परतीच्या प्रवासासाठी विमान सकाळी ७.५० वाजता निघून मुंबईला सकाळी ८.५५ वाजता पोहोचते. सकाळच्या विमानाला मोठी गर्दी असते. ‘वंदे भारत’ आता १० मिनिटे उशिरा सुटेल वंदे भारत छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ८.१५ वाजता सुटत असे. सुधारित वेळेनुसार ३ मे २०२६ पासून वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ८.२५ वाजता सुटणार आहे. छत्रपती संभाजीनगरहून १० मिनिटे उशिरा सुटूनही मुंबई सीएसटीएमला मात्र पूर्वीच्या वेळेच्या तुलनेत १० मिनिटे लवकर (दुपारी २.२५ ऐवजी २.१५ वाजता) पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात सायंकाळी ६.५३ ऐवजी सायंकाळी ६.४३ वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर पोहोचेल. तत्कालीन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी केली होती. ऑक्टोबरअखेरपर्यंत नवीन रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळले नाही अशी होणार अडचण नवी मुंबई विमानतळावर सकाळचे विमान याच वेळेत गेल्यानंतर विदेशी पर्यटकांना पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जावे लागेल. रस्तेमार्गाने जायचे झाल्यास २ तासांपेक्षा जास्तीचा वेळ जुन्या विमानतळासाठी लागेल. इतर प्रवासी मुंबई शहरात जाऊ इच्छितात, त्यांनाही दोन तासांचा अधी लागू शकतो. शिवाय मुंबई शहरातील वाहतुकीमुळेही प्रवासासाठी अधिकचा वेळ लागेल. इनसाइड स्टोरी- राजकीय नेत्यांची ताकद अपुरी संभाजीनगर येथून सकाळी ६ वाजता सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ची वेळ २ तासांनी वाढवल्यानंतर ही रेल्वे गैरसोयीची झाली. पूर्वी संभाजीनगरहून सकाळी ६ वाजता निघून दुपारी १२.३० वाजता मुंबईला पोहोचत होती. त्यामुळे मंत्रालय, उच्च न्यायालयांत वेळेत पोहोचणे शक्य होते. परतीसाठी दुपारी ३ रेल्वेंचे पर्याय होते. त्यामुळे सकाळी सुटणारी रेल्वे सुरू करण्याची मागणी होती. मात्र, सकाळची रेल्वे सुरू करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींची ताकद कमी पडली आहे.
