मराठी विद्यार्थ्यांनी घडवले बंगाली संस्कृतीचे दर्शन:सोलापूरच्या संघाची मुंबईमध्ये छाप, विद्यार्थ्यांनी सादर केले ‘गिरी सून लो खोबोर’ हे दुर्गा पूजेचे गीत

मुंबई येथील महाराष्ट्र लोकभवन येथे केंद्र शासनाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत शनिवारी (दि. २०) पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी बंगाली गीत, लोकनृत्य आणि कथ्थकच्या माध्यमातून उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केले. या सादरीकरणाबद्दल राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सोलापूर विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला. दोन्ही राज्ये परस्परांपासून दूर असली तरी त्यांची अस्मिता समान असल्याचे राज्यपाल वर्मा यांनी सांगितले. दोन्ही राज्यांना इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रवादाने जोडले असून, त्यांनी संत तुकाराम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्वामी विवेकानंद यांसारख्या महान विभूती तसेच स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस यासारखे नेते देशाला दिल्याचे त्यांनी नमूद केले. बंगालने देशाला ‘वंदे मातरम’ व ‘जन गण मन’ ही राष्ट्रीय गीते दिल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, सांस्कृतिक समन्वयक डॉ. केदारनाथ काळवणे, लोकभवनचे अधिकारी, कर्मचारी आणि मुंबईतील शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केले ‘गिरी सून लो खोबोर’ हे दुर्गा पूजेचे गीत
कार्यक्रमादरम्यान सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दुर्गा पूजेचे गीत ‘हे लो गिरी सून लो खोबोर’ सादर केले, तसेच पश्चिम बंगालच्या अजरामर व्यक्तिमत्वांची गाथा सांगणारे एकपात्री सादरीकरण केले. या प्रसंगी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी देशाच्या विविध भागांतील पश्चिम बंगालच्या नागरिकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!