महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या प्रचंड फोडाफोडीच्या आणि पक्षांतराच्या नाट्यादरम्यान आता सत्ताधारी महायुतीमधून एक अत्यंत अजब आणि राजकीय चर्चांना उधाण आणणारे विधान समोर आले आहे. “ज्यांना आगामी काळात आमदार व्हायची इच्छा आहे, त्यांनी अजिबात काळजी करू नये. कारण ‘देवाभाऊ’ म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक दैवी शक्ती आहे,” असा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम यांच्या विजयानंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. एककीडे ठाकरे गटाचे ६ खासदार फुटून शिंदे गटात गेल्यानंतर आता शरद पवार गटाचे खासदार आणि ठाकरे गटाचे उर्वरित आमदारही फुटणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. अशा अत्यंत संवेदनशील राजकीय वातावरणात जयकुमार गोरे यांच्या या ‘दैवी शक्ती’च्या विधानाने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. देवाभाऊ प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठाम आपल्या विधानाचा खुलासा करताना मंत्री जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळचा एक विशेष किस्सा जाहीर केला. ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी मला, धैर्यशील कदम, अतुलबाबा आणि मनोजदादा या चौघांनाही तुम्ही विधानसभेत जाणार असे सांगितले होते. आज आम्ही चौघेही आमदार झालो आहोत. जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतात, त्यांच्या पाठीशी ‘देवाभाऊ’ ठामपणे उभे राहतात. देवेंद्रजींकडे असलेली शक्ती ही सर्वांचे समाधान करणारी आहे. त्यामुळे आता ज्यांना कोणाला आमदार व्हायचे असेल, त्यांनी चिंता करण्याची गरज नाही.” १०० मतांच्या फुटीवरून महायुतीत धुसफूस; शंभूराज देसाईंवर थेट निशाणा सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत जरी भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला असला, तरी या निवडणुकीत फुटलेल्या १०० मतांमुळे महायुतीमधील अंतर्गत वाद आता पूर्णपणे चव्हाट्यावर आला आहे. या फुटलेल्या मतांचा हिशोब चुकता करण्याचा इशारा देत जयकुमार गोरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा यांच्यावर नाव न घेता थेट तोफ डागली. कराड येथे माध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे संतप्तपणे म्हणाले, “आम्ही हिशोबात अत्यंत पक्के आहोत आणि या फुटीचा नक्कीच हिशोब केला जाईल. अनेक नेत्यांच्या ओठात एक, मनात एक आणि प्रत्यक्षात करणीत तिसरेच काहीतरी वेगळे असते. परंतु, आमचा गेम करणे कोणालाही शक्य झाले नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा हे निवडणुकीत प्रामाणिकपणे महायुतीसोबत राहिले की नाही, हे आता फक्त देवालाच ठाऊक!” त्यांच्या या विधानामुळे सातारा-सांगलीच्या राजकारणात नवीन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ३०१ मतांनी विजय; यशवंतराव चव्हाणांना अभिवादन अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत भाजपचे नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांनी ३०१ मताधिक्य मिळवून दिमाखदार विजय संपादन केला. विजयानंतर आमदार कदम यांनी कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतीसंगमावरील समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. याप्रसंगी मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह भाजप आणि महायुतीचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील अंतर्गत दरी अधिक रुंदावल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
