शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिक स्थित तपोवनातील वृक्षतोडीवरून सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली. प्रभू श्रीरामांच्या पंचवटीत झाडे तोडण्याचे काम राक्षसच करू शकतात. हे लोक साधुग्रामच्या नावाखाली जागा बिल्डरांच्या घशात घालण्याच्या प्रयत्नांत आहेत, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या तपोवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधून वृक्षतोडीला जोरदार विरोध केला. ते म्हणाले, प्रभू श्रीरामांच्या पंचवटीत झाडे तोडम्याचे काम राक्षसच करू शकतात. या लोकांचा साधूग्रामच्या नावाखाली तपोवनाची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आहे. भाजपचे हिंदुत्त्व चुनावी आहे. भाजप देशात रामराज्य नव्हे तर रावण राज्य आणण्याच्या प्रयत्नांत आहे. भाजप म्हणजे बिल्डर जनता पार्टी आहे. भाजप आमदार होता म्हणून बलात्कार करूनही एका आमदाराला जामीन मिळाली. ज्याला फाशीवर चढवायला हवे, त्याला बेल मिळाली. भाजपने साधू हत्याकांडातील आरोपीला का प्रवेश दिला? बिलकिस बानोच्या कुटुंबाला तिच्या डोळ्यापुढे मारून टाकले. लाडकी बहीणवर बोललो म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिडले होते. पण ते राज्यातील वाढती गुन्हेगारी व बेरोजगारीवर काहीही बोलत नाही. भाजप धर्माचे राजकारण करतो. मग त्यांनी पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला का प्रवेश दिला? खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे अशी त्यांची सवय आहे, असे ते म्हणाले. 24 तासांत युतीची गोड बातमी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत 4 मेडिकल कॉलेज आणले. आपल्याला नाशिक महापालिकेत किमान एक मेडिकल कॉलेज आणायचे आहे. नाशिकमधील प्रत्येक वॉर्डात सुसज्ज शाळा आणायच्या आहेत. आम्ही हे मुंबईत करून दाखवले आहे. ते आता नाशिकमध्ये करायचे आहे. आपल्याला तपोवन वाचवायचे आहे. भाजपने फक्त कर वाढवला. आपण प्रत्यक्षात परिवर्तन घडवून आणणार आहोत. आपले चिन्हच मुळात परिवर्तनाचे आहे. युतीची गोड बातमी पुढच्या 24 तासांत मिळेल, असेही आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले, आम्ही मुंबई महापालिकेत करून दाखवले. आता तुमची सत्ता राज्यात व केंद्रातही आहे. तुम्ही स्वतः केलेले एखादे काम दाखवा. तुम्ही फक्त फोडाफोडीचे राजकारण केले. जेवढे इनकमिंग भाजपत होईल, तेवढा इथल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना मान मिळेल. भाजप व संघाला एक प्रश्न आहे. सगळे भ्रष्टाचारी लोक तुमच्या पक्षात आहेत. ज्यांच्यावर खोटे आरोप होते, ते आमच्याकडे आहेत. पण भाजपत सर्वच कलंकित नेते आहेत. ते त्यांनी जनतेला विचारून घेतले का हे सांगावे, असे ते म्हणाले.
