शिवसेना ठाकरे गटाला (उबाठा) पुन्हा एकदा सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले असून, ठाकरे गटाचे 6 खासदार फुटण्याच्या तयारीत आहेत. हे सर्व खासदार काल दुपारपासूनच दिल्लीत दाखल झाले असून ते स्वतंत्र गट निर्माण करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या फुटीवर अत्यंत आक्रमक आणि मोठा दावा केला आहे. त्यांनी नाव न घेता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भस्मासूर’ म्हटले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत टोकदार शब्दांत निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, तुमच्या एका मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी तुम्ही जो ‘भस्मासूर’ जन्माला घातला होता, आता त्या भस्मासुराची ताकद एवढी वाढली आहे की, तो तुमच्याच डोक्यावर हात ठेवायला मागेपुढे पाहणार नाही, इथपर्यंत त्याचे हात सरसावले आहेत, असे अंधारे यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीत जाण्याच्या महत्त्वाकांक्षा आता लपून राहिलेल्या नाहीत. परंतु, फडणवीस यांनी दिल्लीत पोहोचू नये, म्हणूनच त्यांच्याच पक्षातील दिल्लीत बसलेले नेते त्यांच्या मार्गात ‘लांबसडक स्पीड ब्रेकर’ टाकण्याच्या तयारीत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
या खासदारांचा वेगळा गट होण्याची चर्चा… डॅमेज कंट्रोलसाठी राऊत-अरविंद सावंत दिल्लीत या घडामोडींमुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनीही दिल्ली गाठली आहे. फुटीची शक्यता रोखण्यासाठी ते नाराज खासदारांशी संपर्क साधत असल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर थेट आरोप करत, “खासदारांना फोडण्यासाठी १५ कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे,” असा दावा केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
