पांगरीत खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे रखडल्या:शेतकरी चिंतेत, बियाणे, खते खरेदी करूनही शेतकरी चिंतेत; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर‎

पांगरी (ता. बार्शी) या भागात जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली असली तरी पुरेसा ओलावा नसल्याने पेरणीला सुरुवात करता आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेत मशागतीची कामे पूर्ण करून खरीप हंगामासाठी तयारी केली आहे. मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद व मका आदी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस लांबल्यास खरीप हंगामाचे नियोजन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाअभावी केवळ पेरण्याच नव्हे तर पशुधनासमोरील चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. या भागातील ग्रामीण भागात सध्या शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले असून लवकर पाऊस पडावा, अशी आस धरून शेतकरी बसला आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही तर पशुपालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी. ^बाजारपेठेतून खते व बियाणे आणून ठेवले असले तरी पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या आहेत. आणखी १५ दिवस समाधानकारक पाऊस झाला नाही तर पशुपालकांसमोर मोठे संकट उभे राहील. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनेल. चारा उपलब्ध न झाल्यास काही पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ येईल. — प्रमोद माळी, शेतकरी व पशुपालक, पांगरी ^खरीप पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होणे आवश्यक आहे. किमान ९० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. अपुऱ्या पावसावर पेरणी केल्यास उगवण व पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पुरेशा पावसाची प्रतीक्षा करावी. — सुधीर काशीद, मंडळ कृषी अधिकारी, पांगरी.

Leave a Comment

error: Content is protected !!