अमळनेर तालुक्यात पिंपळे परिसरात खरीप हंगामाची लगबग सुरू असून शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, येथील शेतकरी भीमराव नारायण पाटील यांच्या शेतालगत असलेल्या विद्युत रोहित्राची (डीपी) प्रचंड दुरावस्था झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून या “डीपी’लगतची वीजतार तुटून पडलेली असल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या रोहित्राला संरक्षणासाठी लोखंडी पेटी किंवा फेन्सिंगची कोणतीही व्यवस्था नाही. खरीप हंगामामुळे सध्या शेतात ट्रॅक्टर, मजूर आणि शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत उघडे रोहित्र आणि जमिनीवर पडलेली वीज तार यामुळे शेतकरी व जनावरांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असून, हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार फोन करूनही त्यांनी अद्याप याकडे पाठ फिरवली असल्याचा संतप्त आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, महावितरणच्या अशाच निष्काळजीपणामुळे मागील रब्बी हंगामात याच परिसरातील गव्हाच्या पिकाला आग लागून मोठे नुकसान झाले होते. या जुन्या घटनेतून ही प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. “मागच्या हंगामात पीक जळाले, आता खरीप पेरणी अडली; महावितरणने आणखी किती नुकसान झाल्यावर जागे व्हायचे?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.