सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नाशिकचे तत्कालीन आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर अशोक खरातला पाठिशी घालण्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा दत्तात्रय कराळे यांचा गुरू होता. त्यामुळे ते आपल्या गुरूवर कशी कारवाई करतील? त्यांनीच त्याला पाठिशी घातले, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी भोंदू अशोक खरातचे एन्काउंटर होण्याची भीतीही व्यक्त केली. तृप्ती देसाई टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या की, अनेक बडे नेते अशोक खरातच्या संपर्कात होते. त्यांच्यात आर्थिक संबंधही होते. आमदार, खासदार, आयएएस अधिकारी आदी सर्वांचेही खरातशी संबंध होते. या सर्वांची नावे पुढे येऊ नयेत म्हणून एकच मार्ग उरतो. तो म्हणजे खरातला संपवण्याचा. त्यामुळे अशोक खरातचे एन्काउंटर होऊ शकते. त्यामुळेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा डाव उधळवून लावण्याचे आवाहन केले आहे. हे रॅकेट पूर्णतः उद्धवस्त करण्याची गरज आहे. या प्रकरणात जे कुणी अधिकारी, नेते आहेत, त्यांच्यावर मकोका अंतर्गत झाली पाहिजे. अशोक खरातला शिक्षा झाली पाहिजे. तसेच त्याच्याशी संबंध असलेल्यांवरही कारवाई झाली पाहिजे. गतवर्षीच प्रकरण उजेडात येणार होते तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या, गतवर्षी मार्च महिन्यात श्रीरामपूरच्या एका दैनिकात अशोक खरातशी संबंधित एक बातमी आली होती. तेव्हा मला फोन आला होता. कॅप्टन म्हणून ओळखला जाणाऱ्या अशोक खरातचे काही व्हिडिओ आमच्याकडे येणार असल्याचे मला सांगण्यात आले होते. त्यानंतर महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दबाव आणला. जे लोक पेनड्राईव्ह देणार होते, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यामुळेच त्या लोकांनी ते व्हिडिओ देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर गत 5 मार्च रोजी काही लोक तो पेनड्राईव्ह घेऊन आले. त्यानंतर अशोक खरात परदेशात पळून जाणार होता. पण मी त्या लोकांना पोलिसांकडे पाठवले आणि पुढे कारवाई झाली. आयजी दत्तात्रय कराळेंवर गंभीर आरोप तृप्ती देसाईंनी यावेळी आयजी दत्तात्रय कराळेंवर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, आयजी दत्तात्रय काळेंनी अशोक खरातला वारंवार पाठिशी घातले. त्यामुळे त्याची हिंमत वाढली. आयजीच खरातला गुरू मानत असतील, तर ते त्यांच्यावर कशी कारवाई करणार? यामुळे हे प्रकरण गतवर्षी उघड झाले नाही. पोलिसांचा दबाव वाढला होता. आयजी कराळे यांची या प्रकरणात मोठी चूक आहे. चाकणकरांचा प्रकरण दाबण्याचा पुरेपुर प्रयत्न रुपाली चाकणकरांनी पीडित महिलांसाठी एकही फोन केला नाही. पण त्यांनी त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घातले. त्यामुळे त्याच याला जबाबदार आहेत. त्यांनी पत्रकारांवर दबाव टाकला. त्यांना नोटीसा पाठवल्या. त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी केले पाहिजे. चाकणकरच नाही तर या प्रकरणात जे-जे दोषी आढळतील, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करतो हे चाकणकरांना गतवर्षीच माहिती झाले होते. पण त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे अशोक खरातच्या कृत्यांची मला माहिती नव्हती हे त्यांचे म्हणणे साफ चुकीचे आहे. चाकणकर अशोक खरातला गुरू मानत होत्या.
आता अशोक खरातला अटक झाली आहे. त्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे. सरकारसाठी महिलांची प्रतिष्ठा अत्यंत महत्त्वाची असल्याचे ते म्हणालेत. त्यामुळे पुढे काय कारवाई होते हे पहावे लागेल, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
