बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर: लग्नानंतर 12 वर्षांनी मुलगा झाला. त्यामुळे सगळं कुटुंब आनंदात होतं. समर्थ सगळ्यांचा लाडका होता. हसत-खेळत मोठा होत होता, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. 9 वर्षांचा समर्थ रस्त्यावर सायकल खेळताना पडला. तेव्हा एका भटक्या कुत्र्यानं जखम चाटली आणि जीवघेण्या आजारानं गाठलं. शुक्रवारी पहाटे त्यानं अखेरचा श्वास घेतला. समर्थ योगीनाथ स्वामी (रा. घोंगडे वस्ती, सोलापूर) याचा रेबीजमुळे मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांपूर्वी समर्थ आपल्या मित्रांसोबत गल्लीत सायकल खेळत होता. त्यावेळी तो सायकलवरून रस्त्यावर पडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली होती आणि रक्तस्राव झाला होता. त्याच वेळी एका भटक्या कुत्र्याने त्याच्या पायावरील ती उघडी जखम चाटली होती. समर्थच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने त्या वेळी या दुखापतीकडे योग्य ते वैद्यकीय उपचार अथवा रेबीज प्रतिबंधक लस वेळेवर मिळू शकली नाही.
सोलापुरात हे काय घडतंय? 40 जणांना उलटी अन् जुलाब, एका महिलेचा मृत्यू, सगळीकडे खळबळ
दोन महिन्यांपासून सुरू होता त्रास
गेल्या दोन महिन्यांपासून समर्थला सतत ताप, उलटी आणि जुलाबाचा त्रास होत होता. त्याच्यावर स्थानिक खासगी रुग्णालयांमध्ये उपचारही सुरू होते. मात्र, 23 जून रोजी त्याचा त्रास अचानक वाढल्याने त्याला सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास समर्थची प्राणज्योत मालवली. कुत्र्याने जखम चाटल्याने त्याला रेबीजचा संसर्ग झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
पीपीई किट घालून पार पडले शवविच्छेदन
रेबीजच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांच्या पथकाने कोरोना काळातील सुरक्षेचे नियम पाळत, पीपीई किट परिधान करून शुक्रवारी दुपारी समर्थच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पार पाडले. त्यानंतर अश्रूपूर्ण नयनांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिस तपास सुरू
रोज आनंदाने शाळेत जाणाऱ्या निष्पाप समर्थच्या अशा अचानक आणि दुर्दैवी जाण्यामुळे घोंगडे वस्ती परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस अधिकारी लक्ष्मण घोडके पुढील तपास करत आहेत.