मोठ्या भावाच्या अकाली निधनानंतर छोट्या भावाने आपल्या भावजयीशी लग्न करून उघड्यावर पडलेल्या आपल्या पुतण्यांना वडिलांची माया दिल्याची अभिमानास्पद घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीचा आधार हिरावला जातो. मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्रही हरवले जाते. एवढेच नाही तर नातेसंबंधातंही दुरावा निर्माण होतो. मात्र, नांदेड जिल्ह्यातील दुर्गम किनवट तालुक्यात या सर्वांना छेद देणारी एक घटना घडली आहे. प्रस्तुत घटनेत मोठ्या भावाच्या अकाली निधनानंतर छोट्या भावाने भावजयीशी विवाह करून भावाच्या मुलांच्या डोक्यावर पुन्हा पितृछत्र धरल्याची घटना घडली आहे. प्रफुल्ल पाटील असे या धाडसी निर्णय घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मार्च महिन्यात झाले होते मोठ्या भावाचे निधन यासंबंधीच्या माहितीनुसार, किनवट तालुक्यातील वझरा (बु.) येथील अष्टपाल पाटील यांचे गत महिन्यात प्रदिर्घ आजाराने निधन झाले होते. अष्टपाल यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांची पत्नी विजयालक्ष्मी यांच्यासह 8 वर्षीय मुलगी व 6 वर्षीय अंध मुलगा उघड्यावर पडला. मुलांच्या डोक्यावरील पितृछत्र हरवल्यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले. हे पाहून धाकटा भाऊ प्रफुल्ल पाटील यांनी या प्रकरणी एक धाडसी निर्णय घेत आपल्या भावजयीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा प्रस्ताव आपल्या कुटुंबीयांपुढे ठेवला. प्रफुल्ल पाटील यांच्या या निर्णयाला कुटुंबीयांनी साथ दिली. त्यांनी विजयालक्ष्मी यांची समजूत काढली. त्यांच्या आई-वडिलांनाही विश्वासात घेतले. त्यानंतर प्रफुल्ल व विजयालक्ष्मी यांचे एका छोटेखानी कार्यक्रमात लग्न लावून देण्यात आले. वैयक्तिक सुखाचा त्याग करून रक्ताच्या नात्याला व माणुसकीला महत्त्व देणाऱ्या प्रफुल्लच्या या निर्णयाचे ग्रामस्थ तोंडभरून कौतुक करत आहेत. वहिनीला सन्मानाने जगता यावे म्हणून घेतला निर्णय प्रफुल्ल पाटील हे व्यवसायाने ऑटोचालक आहेत. ते ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी स्वतःच्या संसाराचा विचार करण्यापेक्षा आपल्या भावाच्या मुलांच्या भविष्याला प्राधान्य दिले. माझ्या भावाच्या पश्चात ही मुले अनाथ होऊ नयेत, तसेच वहिनीला समाजात सन्मानाने जगता यावे, हा या विवाहामागील माझा मुख्य उद्देश होता. ही केवळ माझी जबाबदारी नसून, भावाप्रती असलेले माझे कर्तव्यही आहे, अशी भावना प्रफुल्ल यांनी या प्रकरणी व्यक्त केली. विखुरलेलं कुटुंब पुन्हा एकत्र किनवट तालुक्यात घडलेली ही घटना समाजात माणुसकी आणि कुटुंबाच्या नात्यांची जपणूक किती महत्त्वाची आहे, याचा प्रत्यय देणारी ठरली आहे. मोठ्या भावाच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत छोट्या भावाने केवळ कर्तव्य पार पाडले नाही, तर आपल्या पुतण्यांना वडिलांची माया देत त्यांच्या भवितव्यासाठी आधारही निर्माण केला. या निर्णयामुळे एक विखुरलेले कुटुंब पुन्हा एकत्र आले. समाजात या कृतीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.
