बातमी ऐका (Marathi Voice Reader)
बीड : सध्या अनेक तरुण वेगवेगळे व्यवसाय यशस्वी करत आहेत. बीड जिल्ह्यातील कारी येथील तरुण योगेश गरड यांनी दूध डेअरी व्यवसायातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकेकाळी तेलगाव सहकारी साखर कारखान्यातील दूध डेअरीवर अवघ्या दहा हजार रुपये मासिक पगारावर काम करणारे योगेश आज स्वतःचा दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
योगेश गरड यांच्याकडे दोन एकर शेती होती, मात्र कारी परिसर डोंगराळ असल्याने शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. दुसरीकडे दूध डेअरीवरील दहा हजार रुपयांचा पगारही दैनंदिन खर्च भागवण्यासाठी पुरेसा ठरत नव्हता. त्यामुळे परिस्थिती बदलण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे असा विचार त्यांनी केला. त्यातून स्वतःचा छोटासा दूध डेअरीचा प्लांट सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीला व्यवसाय लहान होता, साधनसामग्री मर्यादित होती आणि ग्राहकवर्गही कमी होता. मात्र, मेहनत, सातत्य आणि व्यवसाय शिकण्याची तयारी यामुळे त्यांनी हळूहळू या व्यवसायाला आकार दिला.
दूध व्यवसाय सुरू केल्यानंतर योगेश यांनी केवळ दूध विक्रीवर अवलंबून न राहता त्यातून अधिक मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचा विचार केला. त्यासाठी त्यांनी पनीर निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले. पनीर तयार करण्याची प्रक्रिया, त्याची गुणवत्ता, चव आणि बाजारपेठेतील मागणी यांचा अभ्यास करत त्यांनी उत्पादन सुरू केले. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. पनीरच्या व्यवसायाने त्यांना आर्थिक आधार दिला आणि पुढे दुग्धजन्य पदार्थांच्या क्षेत्रात आणखी विस्तार करण्याची दिशा मिळाली.
यानंतर योगेश यांनी व्यवसायात विविधता आणण्याचा निर्णय घेतला. लस्सी, बासुंदी आणि श्रीखंड यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती त्यांनी सुरू केली. एका उत्पादनापुरता व्यवसाय मर्यादित न ठेवता ग्राहकांच्या गरजेनुसार विविध पदार्थ तयार करण्यावर त्यांनी भर दिला. गेल्या तीन वर्षांपासून ते या व्यवसायात सातत्याने कार्यरत आहेत. छोट्या प्लांटपासून सुरू झालेला हा प्रवास आता चांगल्या उत्पन्नाच्या व्यवसायात रूपांतरित झाला असून मेहनतीला योग्य दिशा दिल्यास ग्रामीण भागातही दुग्धव्यवसायातून मोठी आर्थिक संधी निर्माण होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.
आज योगेश गरड यांचा या व्यवसायातून वार्षिक नफा सुमारे 11 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र या यशामागे केवळ त्यांची मेहनत नाही तर संपूर्ण कुटुंबाने दिलेले पाठबळही महत्त्वाचे ठरले. अडचणींच्या काळात कुटुंबीयांनी साथ दिल्याने व्यवसाय उभा करण्याचा आत्मविश्वास मिळाला, असे योगेश सांगतात.