नीती आयोग–प्रधानमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा मार्डीत थेट संवाद; सिंचन, शेतरस्ते, वन्यप्राण्यांचा उपद्रव ते सौरपंपापर्यंत समस्यांचा पाढा
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ कागदोपत्री पाहण्याऐवजी त्यांच्या बांधावरच्या वास्तवाची थेट माहिती जाणून घेण्यासाठी नीती आयोग व प्रधानमंत्री कार्यालय, दिल्ली येथील अधिकाऱ्यांनी मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतीसमोरील अडचणी, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळे आणि ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर स्पष्टपणे मांडले.
शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजा समजून घेऊन त्यानुसार भविष्यातील नियोजन व योजनांची आखणी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम नीती आयोगामार्फत कृषी विभागाच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्राची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील दहा गावांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून या उपक्रमासाठी मारेगाव हा एकमेव तालुका निवडण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
शेतकऱ्यांनी मांडले प्रश्न; अधिकाऱ्यांनी घेतली थेट दखल
नीती आयोग व प्रधानमंत्री कार्यालयाचे सोमनाथ चौधरी यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, शेती क्षेत्रात समृद्धी आणण्यासाठी आवश्यक सुविधा आणि शेतकऱ्यांच्या वास्तविक गरजा याबाबत सविस्तर संवाद साधला.
दरम्यान, गेट्स (अथेना) फाउंडेशनचे अंकित सर यांनी सिंचन सुविधांचा विस्तार, सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी उपलब्ध पर्याय आणि त्यातील अडचणी यावर शेतकऱ्यांशी चर्चा केली. सांगलीहून आलेले औदुंबर चव्हाण यांनी शेतीतील मजुरांची टंचाई हा गंभीर विषय असल्याचे लक्षात घेऊन मजूर समस्येवर पर्यायी व्यवस्था काय करता येईल, याबाबत शेतकऱ्यांशी हितगुज केले.
सिंचनापासून वन्यप्राण्यांपर्यंत प्रश्नांचा भडिमार
या संवादात शेतकऱ्यांनी आपल्या रोजच्या शेती जीवनाशी निगडित अनेक प्रश्न थेट अधिकाऱ्यांसमोर मांडले. सिंचन सुविधा, वन्यप्राण्यांचा त्रास, शेतरस्ते, सौरपंप योजनेतील अडचणी, शेतमालाला मिळणारे भाव, बाजारपेठेची व्यवस्था, मजुरांची समस्या तसेच विविध ऑनलाइन योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यासह अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.
शेतकऱ्यांच्या या समस्या केवळ ऐकून न घेता त्यावर उपाययोजना व नियोजन करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही उपस्थित मान्यवरांनी दिली.कृषी विभागाच्या समन्वयातून संवादाला मूर्त रूप उपविभागीय कृषी अधिकारी चंदन निघोट यांनी कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून पुढाकार घेत हा संवाद घडवून आणला.
तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले यांनी प्रास्ताविक केले. मंडळ कृषी अधिकारी किशोर डोंगरकार यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रसन्न पारस्कर यांनी आभार मानले.गावचे प्रथम नागरिक रविराज चंदनखेडे, गोवर्धन तोडासे यांच्यासह संजय गायधन, अशोक निमसटकर, गणेश चौधरी, भास्कर कपाळकर, संजय टोंगे, अनंत काथवटे, श्यामल राऊत, श्रुतिका राऊत, यशोधरा लिहितकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
प्रश्न ऐकले; आता प्रत्यक्ष तोडगा कधी?
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना थेट दिल्लीतील धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने मार्डीतील हा संवाद महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर आता प्रत्यक्ष कृती आराखडा कधी तयार होतो आणि त्याची अंमलबजावणी कितपत होते, याकडे मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हा शेतकरी संवाद यशस्वी करण्यासाठी कृषी विभागातील सर्व उपकृषी अधिकारी व सहायक कृषी अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.