बातमी ऐका (Marathi Voice Reader)
अमरावती : शेतीतील वाढता खर्च, मजुरांची कमतरता आणि हवामानातील बदल यामुळे शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र मागील वर्षीच्या तुरीच्या झाडांवरच पुन्हा उत्पादन घेण्याचा अनोखा प्रयोग करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. नव्याने पेरणी न करता, बियाण्याचा खर्च टाळत आणि शून्य मशागतीच्या आधारावर बहरलेले तुरीचे पीक सध्या अनेक शेतकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे.
योग्य व्यवस्थापनातून बहरले तुरीचे पीक
अमरावती येथील शेतकरी रवींद्र मेटकर यांनी मागील हंगामातील तुरीची झाडे उपटून न टाकता त्यांचे योग्य व्यवस्थापन केले. काही काळ पाणी बंद ठेवून कमकुवत झाडे नैसर्गिकरीत्या बाद होऊ दिली. त्यानंतर पुन्हा सिंचन सुरू करत जैविक पद्धतीने झाडांची वाढ जोमदार होईल, यासाठी प्रयत्न केले. परिणामी जुन्या झाडांना नवीन फुटवे फुटले असून सध्या सात ते आठ फूट उंच तुरीची झाडे शेतात डोलताना दिसत आहेत.
कोंबड्यांमध्ये होणाऱ्या मोल्टिंग पासून सुचली कल्पना
या प्रयोगामागची प्रेरणा त्यांना स्वतःच्या पोल्ट्री व्यवसायातून मिळाली. कोंबड्यांमध्ये होणाऱ्या मोल्टिंग प्रक्रियेत जुनी पिसे गळून नवीन पिसे येतात आणि त्यानंतर कोंबड्या पुन्हा जोमाने अंडी देऊ लागतात. याच संकल्पनेवर आधारित विचार करून तुरीच्या झाडांनाही नव्याने वाढण्याची संधी दिल्यास पुन्हा उत्पादन मिळू शकते, असा प्रयोग त्यांनी प्रत्यक्ष शेतात राबवला.
शून्य खर्चात होणार तुरीचे भरघोस उत्पादन
पीक जोमदार करण्यासाठी अंडी, ताक, गूळ, चुना आणि तुरटीपासून तयार केलेले जैविक पंचामृत तसेच इतर सेंद्रिय फवारण्यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे झाडांना मोठ्या फांद्या फुटल्या असून पिकाची वाढ समाधानकारक झाल्याचे मेटकर सांगतात.
या प्रयोगामुळे नव्याने बियाणे खरेदी, पेरणी, मशागत आणि सुरुवातीच्या खर्चाची मोठी बचत झाली आहे. मागील वर्षीइतकेच नव्हे, तर त्यापेक्षा अधिक उत्पादन मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या काळात कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवण्याचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो, असा त्यांचा विश्वास आहे.