20 वर्षांपासून मोबदल्याची प्रतीक्षेत
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी:– आपल्या परिसराचा विकास व्हावा ही अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामासाठी आपल्या जमिनी दिल्या. मात्र प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे तब्बल 20 वर्षांपासून या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाच मिळाला नाही. त्यामुळे रस्त्यासाठी त्याग नाही. करणाऱ्यांच्या जगण्याचा मार्ग खडतर बनला आहे. अशा हतबल शेतकऱ्यांनी शेवटी मंगळवारपासून यवतमाळात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
झरी-पांढरकवडा परिसरातील सुर्ला, गोधणी परिसरातील हे शेतकरी आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. या शेतकऱ्यांनी 2003 मध्ये सुर्ला- गोधणी या रस्त्यासाठी आपल्या जमिनी शासनाला दिल्या. यात 27 शेतकरी बाधीत झाले आहेत. परंतु, शासन नियमानुसार त्यांना आजपर्यंत जमिनीच्या मोबदल्याचे पैसे मिळालेले नाही. या शेतकऱ्यांनी पांढरकवडा एसडीओंकडे वारंवार हेलपाटे मारूनही त्यांना न्याय मिळाला नाही.
शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनीच यात तोडगा काढावा, अशी अपेक्षा घेऊन या शेतकऱ्यांनी यवतमाळ गाठले. आझाद मैदानात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. गेल्या 20 वर्षांच्या काळात जमिनी नसल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. किमान जमिनीचा मोबदला मिळाला असता तर इतर ठिकाणी जमीन घेवून शेती करता आली असती.
किंवा अन्य व्यवसाय तरी करता आला असता. परंतु, प्रशासनाने त्यांच्या मोबदल्याबाबत उदासीन धोरण अवलंबले आहे. त्यातून काळजीपोटी काही शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करून तातडीने मोबदला मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रंजित तोडासे, मधुकर पवारकर, बबन पाचभाई, मारोती धोबे, जगन पाचभाई, शंकर मंडाळी, दशरथ मेश्राम, मधुकर काकडे, शंकर कोडापे, विलास गोरे, नामदेव मंडाळी, गयाबाई कोडापे, मिराबाई धोबे, जनार्धन धोबे, घागरू मंडाळी आदी शेतकरी उपोषणाला बसले आहे.
