राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना अंबरनाथ शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री गोळीबार केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. अंबरनाथ पश्चिमेतील शंकर मंदिर परिसरात असलेले हे कार्यालय नेहमीच नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या वर्दळीचे केंद्र असते. त्यामुळे भरवस्तीत अशा प्रकारचा गोळीबार झाल्याने सामान्य नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना मध्यरात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार, दुचाकीवरून आलेले दोन अज्ञात इसम अचानक कार्यालयासमोर थांबले आणि क्षणाचाही विलंब न करता कार्यालयाच्या दिशेने 3 ते 4 राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकताच कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आला. मात्र, त्यालाही लक्ष्य करून हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचे दृश्य कार्यालयाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले असून, हल्लेखोरांचा थरारक प्रकार त्यात दिसून येतो. निवडणूक प्रचार जोरात सुरू असताना उमेदवाराच्या कार्यालयावर झालेला हा हल्ला म्हणजे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने अंबरनाथ पोलिस ठाण्यात दाखल झाले. दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. परिसरातील इतर कॅमेरे, मोबाईल लोकेशन आणि दुचाकीचा मार्ग तपासण्याचे काम सुरू असून, लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अंबरनाथ पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन दरम्यान, या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गोळीबार करणाऱ्या संशयितांची नावे माहिती देऊनही त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नरेंद्र पवार यांच्यासह गुलाबराव करंजुळे आणि अनेक भाजप कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. निवडणुकीच्या तोंडावर दबाव टाकून तपासात दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जर आरोपी मोकाट राहिले, तर नागरिकांचा आणि उमेदवारांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी तीव्र प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार या घटनेमुळे अंबरनाथमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. विशेष म्हणजे, आज संध्याकाळी अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असून, त्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निवडणूक प्रक्रियेत हिंसाचार किंवा दहशतीला थारा दिला जाणार नाही, असा संदेश प्रशासनाने द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. उमेदवाराच्या कार्यालयावर थेट गोळीबार होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, याचे पडसाद केवळ अंबरनाथपुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे. येत्या काही तासांत पोलिस तपासात काय निष्पन्न होते आणि आरोपींवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
