Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

लातूरमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता:महापौरपदी जयश्री सोनकांबळे तर उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांच्या नावाची अधिकृत घोषणा; भाजप विरोधी बाकावर

लातूर महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना काँग्रेसने आपला पारंपरिक गड पुन्हा एकदा कायम राखला आहे. बहुमताच्या बळावर महापौर आणि उपमहापौरपदावर काँग्रेसचेच दावे भक्कम असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. अखेर त्यावर शिक्कामोर्तब करत काँग्रेसकडून महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. दोन्ही पदांसाठी इतर कोणतेही दावेदार नसल्याने ही निवड औपचारिक ठरली असून, लवकरच दोघीही अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. लातूर महापालिकेतील 18 प्रभागांमध्ये एकूण 70 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 43 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. वंचित बहुजन आघाडीने 4 जागा जिंकल्या असून काँग्रेस आणि वंचित आघाडी मिळून 47 नगरसेवक त्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे सत्तास्थापना सहज शक्य झाली आहे. याउलट भारतीय जनता पक्षाला 22 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) खात्यात केवळ एक जागा जमा झाली. परिणामी, भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे, हे चित्र स्पष्ट झाले आहे. महापौरपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने यावेळी लातूरला महिला महापौर मिळणार हे निश्चित झाले होते. या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जयश्री सोनकांबळे यांचे नाव पुढे आले आणि त्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले. उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांची निवडही ठरलेली मानली जात होती. कोणताही पर्यायी उमेदवार पुढे न आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध स्वरूपात निश्चित झाल्या. निकाल स्पष्ट होताच लातूर महानगरपालिकेच्या आवारात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. फटाके फोडून, घोषणाबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या या उत्साहात शहराच्या राजकीय वातावरणात काँग्रेसच्या विजयाची छाप स्पष्टपणे दिसून आली. दीर्घकाळापासून लातूरमध्ये असलेला काँग्रेसचा प्रभाव या निकालातून पुन्हा अधोरेखित झाला. नियोजनबद्ध काम करण्याचा निर्धार – जयश्री सोनकांबळे नवनिर्वाचित महापौर जयश्री सोनकांबळे यांनी निवडीनंतर बोलताना महिला सुरक्षितता, शहर स्वच्छता आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. शहरातील नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण देणे हे प्राथमिक उद्दिष्ट असेल, असे त्यांनी नमूद केले. लातूरच्या नागरी समस्यांकडे गांभीर्याने पाहून त्यावर नियोजनबद्ध काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ठोस रोडमॅप तयार केला जाईल – ॲड. स्नेहल उटगे उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे यांनी शहरातील मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका मांडली. रस्ते, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन या तीन प्रमुख समस्यांवर प्राधान्याने काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. निसर्गाने पाण्याची कमतरता दिलेली नसतानाही शहरात पाणीपुरवठा उशिरा होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यासाठी सुसूत्रीकरण करून लातूरकरांना मुबलक आणि वेळेवर पाणी मिळेल, यासाठी ठोस रोडमॅप तयार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने लातूरचा गड कायम ठेवला दरम्यान, या निवडणुकीदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमधील सभेत दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, असे विधान केले होते. या वक्तव्यामुळे राज्यभरात लातूरची निवडणूक चर्चेत आली होती. कोणत्या पक्षाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर 43 जागांसह काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत लातूरचा गड कायम ठेवला आणि राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!