मोदींवर आरोप म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार:चर्चेत राहण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा केविलवाणा प्रयत्न, एकनाथ शिंदेंचा पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘एपस्टीन फाईल्स’बाबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. “पंतप्रधानांबद्दल काहीही बोलून चर्चेत राहण्याचा हा पृथ्वीराज चव्हाणांचा केविलवाणा प्रयत्न असून, त्यांचे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे,” अशा शब्दांत शिंदेंनी चव्हाणांवर तोफ डागली. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी उपमहापौर आबा ऊर्फ उल्हास बागुल यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले. नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे? पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “जेव्हा लोक दुर्लक्षित होतात, तेव्हा चर्चेत राहण्यासाठी अशा सनसनाटी बातम्या पसरवल्या जातात. 2014 पासून पंतप्रधान मोदींनी देशासाठी केलेले काम सर्वांना माहीत आहे. आज आपली अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकावर असून आपण तिसऱ्या क्रमांकाकडे वाटचाल करत आहोत. ही जी प्रगती सुरू आहे, त्यातून होणारी पोटदुखी आणि जळजळ चव्हाणांच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसत आहे.

” चव्हाणांकडे सांगण्यासारखे काही उरले नाही पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यांमधील विसंगतीवर बोट ठेवत शिंदे म्हणाले, “आधी पृथ्वीराज चव्हाण सांगत होते की 19 डिसेंबरला पंतप्रधान बदलतील, आता ते एपस्टीन फाईल्स आणि मोदींचे संबंध शोधायला सांगत आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच उरलेले नाही. तुम्ही लष्कराच्या शौर्यावर संशय व्यक्त करता, ही कसली देशभक्ती? तुम्ही जेवढे मोदींवर आरोप कराल, तेवढी देशातील जनता अधिक ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी राहील.” राहुल गांधींवरही साधला निशाणा केवळ पृथ्वीराज चव्हाणच नव्हे, तर राहुल गांधी यांच्यावरही एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्ला चढवला.

“राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. ते लष्कराचा अपमान करतात आणि पाकिस्तानचे म्हणणे खरे मानतात. युद्धात आपण हरलो होतो, असे म्हणताना त्यांना आनंद होतो. त्यांचे हे पाकिस्तान प्रेम उतू चालले आहे. हा देशद्रोह आणि देशाशी केलेली बेईमानी आहे. देशातील जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल,” असा घणाघात शिंदेंनी केला. पुण्यात काँग्रेसला मोठे खिंडार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

उल्हास बागुल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने पुण्याच्या राजकारणात नवी समीकरणे तयार झाली आहेत. “विकसित भारताच्या संकल्पात सहभागी होण्यासाठी अनेक नेते आमच्यासोबत येत आहेत,” असे सांगत शिंदेंनी आगामी निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. याचवेळी माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपांवर पलटवार केला.

Leave a Comment

error: Content is protected !!