रस्ता सुरक्षा आणि कार्यक्षमतेसाठी योगाभ्यास आवश्यक:मोटर वाहन निरीक्षक वसंत कलंबरकर यांचे प्रतिपादन, दिव्य मराठीशी साधला संवाद

रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सुरक्षित वाहन चालविण्याची संस्कृती रुजविण्यासाठी योगसाधना अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन मोटर वाहन निरीक्षक तथा योगशास्त्री वसंत कलंबरकर यांनी दिव्य मराठीशी बोलतांना केले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने बोलतांना त्यांनी ‘योगिक प्रक्रिया, रस्ता सुरक्षा आणि कार्यक्षमता’ या लेखातून त्यांनी योग आणि वाहन चालक यांचा थेट संबंध स्पष्ट केला आहे. रस्ता सुरक्षेचे तीन आधारस्तंभ म्हणजे सुरक्षित रस्ते, सुरक्षित वाहने आणि सुरक्षित चालक यापैकी सुरक्षित चालक घडविण्यासाठी योगसाधना महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या संदर्भात कलंबरकर यांनी सांगितले की की, भारतामध्ये आधुनिक वाहने आणि नवीन रस्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. एकूण अपघातांपैकी 96 ते 98 टक्के अपघात हे चालकांच्या निष्काळजीपणामुळे, मानसिक तणावामुळे, अस्थिर मनस्थितीमुळे किंवा एकाग्रतेच्या अभावामुळे घडतात. योग आणि वाहन चालक यांचा संबंध स्पष्ट करताना कलंबरकर म्हणाले की, वाहन चालवताना चालकाने सतत रस्ता, सिग्नल, पादचारी आणि इतर वाहनांवर लक्ष ठेवणे आवश्यक असते. ध्यान आणि प्राणायामामुळे एकाग्रता वाढते. वाहतूक कोंडी, वेळेचा ताण आणि प्रदूषण यामुळे चालक तणावग्रस्त होतो. योगामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत राहते. आक्रमक वाहनचालन हे अपघातांचे प्रमुख कारण आहे. योगामुळे संयम आणि आत्मनियंत्रण वाढते. अचानक समोर आलेल्या धोक्याच्या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी मानसिक स्थैर्य आवश्यक असते. राजयोग आणि ध्यानयोग यामुळे निर्णयक्षमता वाढते. लांब पल्ल्याचे चालक अनेक तास वाहन चालवतात. हठयोग व आसनांमुळे पाठदुखी, मानदुखी आणि थकवा कमी होतो. योगामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, त्यामुळे चालक सतर्क राहतो आणि डुलकीमुळे होणारे अपघात टळतात. रस्ता सुरक्षेसाठी उपयुक्त योगिक प्रक्रियांमध्ये अनुलोम-विलोम केल्याने मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि एकाग्रता वाढते. भ्रामरी प्राणायामाने मानसिक ताण कमी होतो. राग व चिंता नियंत्रित होतात. कपालभातीमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. शरीरात ऊर्जा निर्माण होते. ताडासनाने शरीराचा तोल सुधारतो. वज्रासनाने मानसिक स्थैर्य वाढते. ध्यानामुळे मन शांत व एकाग्र राहते. योगाभ्यासामुळे चालकाची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. कामाचा दर्जा सुधारतो. प्रतिक्रिया देण्याचा वेग वाढतो. शारीरिक थकवा कमी होतो. मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि अपघातांची शक्यता कमी होते. भारतासाठी सुचविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये योग आणि मानसिक आरोग्य प्रशिक्षण चालक परवाना प्रक्रियेत समाविष्ट करणे, व्यावसायिक चालकांसाठी नियमित योग, ध्यान व तणाव व्यवस्थापन कार्यशाळा घेणे, चालकांच्या थकव्याची तपासणी करणारी तंत्रज्ञान प्रणाली वापरणे, बायोमेट्रिकी व स्वयंचलित कॅमेरे एक आय आधारित वाहतूक अंमलबजावणी, शालेय स्तरावर रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे नियम व शिक्षण अभ्यासक्रम, अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय मदत, चालकांसाठी वार्षिक आरोग्य व मानसशास्त्रीय तपासणी आणि मोटार अधिनियम 2019 मधील तरतुदीनुसार पर्यवेक्षकीय प्रभावी अंमलबजावणी यांचा समावेश आहे. प्रगत देशांनी रस्ते, वाहने आणि कायदे सुधारले; परंतु भारतासारख्या देशात मानवी घटक सर्वात महत्त्वाचा आहे. योग हा चालकाच्या मनावर, भावनांवर आणि निर्णयक्षमतेवर थेट परिणाम करतो. त्यामुळे व्हिजन शून्य सोबत योगिक चालक व्हिजन ही संकल्पना विकसित केल्यास अपघात कमी करण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. सुरक्षित रस्ते, सुरक्षित वाहने आणि सुरक्षित चालक हे रस्ता सुरक्षेचे तीन आधारस्तंभ आहेत. यापैकी सुरक्षित चालक घडविण्यासाठी योगसाधना अत्यंत प्रभावी माध्यम आहे. प्रगत देशांच्या तांत्रिक उपाययोजना आणि भारतीय योग परंपरा यांचा संगम घडवून आणल्यास भारत अपघातमुक्त व अधिक कार्यक्षम राष्ट्र बनू शकतो असे कलंबरकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

error: Content is protected !!