शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’मुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असतानाच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ठाकरे गटातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चेदरम्यान, ओमराजे यांनी आपण अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बंडखोर गटातील संख्याबळाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाने दिल्लीत संसदीय पक्षाची तातडीची बैठक बोलावून सर्व खासदारांना व्हीप जारी केला असतानाही ओमराजे निंबाळकर यांनी कोणत्याही बैठकीला जाणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते नेमके कोणत्या भूमिकेत आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पवनराजे हत्या प्रकरणामुळे सध्या राजकारण बाजूला ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही. सध्या माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण सर्वात महत्त्वाचे आहे. या प्रकरणाचा निकाल 20 जून रोजी लागणार आहे. निकाल आल्यानंतरच माझी भूमिका स्पष्ट करेन.” यावेळी त्यांनी आपण सध्या दिल्लीत नसून पुण्यात असल्याचेही सांगितले. त्यामुळे बंडखोर खासदारांच्या बैठकीत किंवा ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीत ते सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. ठाकरे गटाचा व्हीप; पण कायदेशीर पेच निर्माण? दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्व नऊ खासदारांना संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या खासदारांवर पुढे कारवाईचा आधार तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. मात्र, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीच एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठीचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे एक दिवस आधीच सादर केले होते. त्यानंतरच ठाकरे गटाने व्हीप जारी केला. त्यामुळे हा व्हीप कायदेशीरदृष्ट्या कमकुवत ठरू शकतो. अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले की, “बंडखोर खासदारांचे पत्र कालच लोकसभा अध्यक्षांकडे पोहोचले होते. आम्ही आज व्हीप काढला. त्यामुळे आमचा व्हीप अयोग्य ठरल्याची माहिती मिळत आहे.” सहा खासदारांचा स्वतंत्र गट; पण दोन स्वाक्षऱ्यांवर प्रश्न? शिंदे गटाच्या संपर्कात गेलेल्या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, ठाकरे गटाचा दावा आहे की लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रावर सहा पैकी दोन खासदारांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. काही आश्वासने पूर्ण न झाल्याने दोन खासदारांनी अंतिम क्षणी पाऊल मागे घेतल्याचा दावा पक्षातील सूत्रांनी केला आहे. त्यामुळे कथित बंडखोर गटाकडे खरंच दोन-तृतीयांश संख्याबळ आहे का, यावरही चर्चा सुरू झाली आहे. धाराशिवमध्ये शिवसैनिकांचा संताप ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची बंडखोरांमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत ओमराजेंना इशारे देण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांनी ओमराजेंना राजकीय संधी दिल्याची आठवण करून देत, त्यांनी पक्ष सोडल्यास ती कार्यकर्त्यांसाठी मोठी विश्वासघाताची बाब ठरेल, असे म्हटले आहे. ‘ऑपरेशन टायगर’ – आतापर्यंतच्या घडामोडी 10 जून : अमित शहा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचा दावा. 14 जून : मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची खासदार बैठक; काही खासदार गैरहजर. 15 जून : काही खासदारांच्या दिल्लीत हालचाली वाढल्या. 16 जून : सहा खासदार दिल्लीत गेल्याच्या चर्चा; शिंदेही दिल्लीला रवाना. 17 जून : स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्याचा दावा. 18 जून : ठाकरे गटाकडून संसदीय बैठकीसाठी व्हीप जारी. संपूर्ण प्रकरणात आता तीन गोष्टी निर्णायक ठरणार आहेत. पहिली म्हणजे लोकसभा अध्यक्षांची भूमिका, दुसरी म्हणजे कथित बंडखोर गटाकडे प्रत्यक्षात दोन-तृतीयांश संख्याबळ आहे का, आणि तिसरी म्हणजे 20 जूननंतर ओमराजे निंबाळकर नेमकी कोणती भूमिका जाहीर करतात. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’मधील सर्वात मोठा सस्पेन्स सध्या ओमराजे निंबाळकर यांच्याभोवतीच फिरताना दिसत आहे. त्यांच्या एका निर्णयावर ठाकरे गटातील या राजकीय भूकंपाची तीव्रता किती वाढणार, हे ठरणार आहे.
