भाजप प्रवेश सोहळ्यावरून नाशिकमध्ये वाद:देवयानी फरांदेंचा विरोध डावलून माजी आमदारासह 5 बड्या नेत्यांच्या हाती कमळ

राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय पक्षांतरांना वेग आला आहे. नाशिकमध्ये आज भाजपने ‘इनकमिंग’चा धडाका लावत विरोधी पक्षांतील अनेक बड्या मोहऱ्यांना आपल्या गळाला लावले. मात्र, या पक्षप्रवेशावरून नाशिक भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख आणि आमदार देवयानी फरांदे यांचा तीव्र विरोध डावलून हा सोहळा पार पडला. फरांदे यांनी या कार्यक्रमाला अनुपस्थित राहून आपली नाराजी उघडपणे व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज नाशिकमधील अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात प्रामुख्याने उबाठा शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर आणि उबाठा नेते यतीन वाघ, काँग्रेस नेते शाहू खैरे, मनसेचे माजी आमदार नितिन भोसले आणि मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांचा समावेश आहे. स्थानिक नेतृत्वाचा ‘बंडाचा’ झेंडा या मोठ्या पक्षप्रवेशांमुळे भाजपची ताकद वाढणार असली, तरी स्थानिक पातळीवर मात्र अस्वस्थता आहे. विशेषतः माजी महापौर यतीन वाघ यांच्या प्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांचा कडाडून विरोध होता. देवयानी फरांदे या नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रमुख आहेत, तरीही त्यांच्या शब्दाला डावलून हे पक्षप्रवेश झाल्याने त्यांनी सोहळ्याला दांडी मारली. त्यांच्यासोबतच अनेक जुन्या कार्यकर्त्यांनीही या ‘इनकमिंग’बद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यतीन वाघ आणि दिनकर पाटील यांच्या पक्षप्रवेशापूर्वी नाशिक भाजप कार्यालयाबाहेर हाय वोलेटेज ड्रामा पहायला मिळाला. या दोघांना पक्षात घेण्यासासंबंधी माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही असं देवयानी फरांदे यांनी म्हटलं कोणत्याही परिस्थितीत हा पक्ष प्रवेश होऊ देणार नाही अशी भूमिका देवयानी फरांदे यांनी घेतली होती. विनायक पांडे आणि यतीन वाघ यांना भाजपत घेतल्यास स्थानिक कार्यकर्त्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्ष प्रवेशाला विरोध होत आहे. दरम्यान, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेशाविराधोत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर घोषणाबाजी देखील केली होती. मात्र, हा सगळा विरोध डावलून पाच नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. सगळ्यांनाच तिकीट मिळणार नाही – गिरीश महाजन स्थानिक नेत्यांच्या नाराजीवर भाष्य करताना गिरीश महाजन म्हणाले की, “अनेक वर्षांपासून पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नाराजी होणे स्वाभाविक आहे. मात्र, पक्ष वाढवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. देवयानी फरांदे यांचा विरोध लवकरच मावळेल.” यावेळी महाजन यांनी पक्षप्रवेश करणाऱ्यांना स्पष्ट इशाराही दिला. ते म्हणाले, “आज ७-८ बड्या नेत्यांनी प्रवेश केला असला, तरी पक्षात प्रवेश म्हणजे तिकीट मिळेलच असं नाही. पक्ष सर्वांच्या कामाचा आढावा घेऊनच निर्णय घेईल.” राजकीय समीकरणे बदलणार? मुंबईत ठाकरे बंधू (शिवसेना-मनसे) आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असताना, नाशिकमध्ये भाजपने विरोधकांचे बालेकिल्ले फोडण्याची रणनीती आखली आहे. मात्र, नव्यांच्या एन्ट्रीमुळे जुन्या कार्यकर्त्यांना डावलले गेल्यास निवडणुकीत भाजपला अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!