मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही, हा दावा करणाऱ्या भाजपवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई मराठी माणसाची असून ती कोणाच्या मित्राला विकण्यासाठी नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगत राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिले. मोदींच्या जवळच्या उद्योगपतीच्या घशात मुंबई घालणे म्हणजे मराठी माणसांची सेवा नसून हा विश्वासघात आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. भाजपने खरोखर मराठी माणसांसाठी काय केलं ते जाहीरपणे सांगावं, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. दरम्यान, राज्यात कायदा-सुव्यवस्थेवरूनही संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजप गुंडांचं राज्य चालवत असून पोलिस यंत्रणा ही भाजपची टोळी बनली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सातारा ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहेत, हे देवेंद्र फडणवीसांना माहीत असल्याचा दावा करत त्यांनी गंभीर आरोप केला. त्या प्रकरणातील आरोपींना अभय दिलं जात असल्याचा आरोप करत राज्यात गुन्हेगारीला संरक्षण मिळत असल्याचं चित्र त्यांनी मांडलं. इतकेच नाही तर या प्रकरणात मुंबईतील एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा समावेश असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. हा पोलिस अधिकारी एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचा असल्याचा मोठा दावा देखील राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठी माणसाला मुंबईबाहेर हुसकावलं गेलं, असा आरोप भाजप नेते करत असताना संजय राऊत यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. ठाकरे बंधू जर सत्तेसाठी एकत्र आले तर तुम्हीही सत्तेसाठी एकत्र आलात का, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसासाठी नेमकं काय योगदान दिलं, याचं उत्तर द्यावं लागेल, असं राऊत म्हणाले. मराठी माणसांची ताकद एकत्र ठेवण्याऐवजी भाजपने ती संघटना फोडण्याचं काम केल्याचा आरोपही त्यांनी केला. अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर भाजप कायमच मौन बाळगत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. गोपीनाथ मुंडे यांना वगळता भाजपमधून कुणीही कधी अखंड महाराष्ट्रासाठी ठाम भूमिका घेतली नाही, असं ते म्हणाले. बेळगाव-कारवार सीमाप्रश्नात मराठी माणसावर अन्याय होत असताना भाजप नेत्यांनी आवाज उठवला नाही. अधिवेशनात महाराष्ट्र तोडण्याची आणि वेगळ्या विदर्भाची भाषा सुरू असताना मुख्यमंत्री म्हणून उभं राहून जाब विचारणं गरजेचं होतं, पण ते कर्तव्य भाजपने पाळलं नाही, असा घणाघात राऊत यांनी केला. बाळासाहेब ठाकरे नसते तर आज भाजप राज्यात सत्तेत असती का? असा सवाल करत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच तुम्हाला या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्राचे तुकडे पाडून एखाद्या छोट्या भागाचे मुख्यमंत्री व्हावे लागले असते, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्राच्या अस्मितेचा खरा रक्षणकर्ता कोण, हे जनतेला चांगलंच माहीत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ज्यांनी शिवसेना सोडली, त्यांनी अभिषेक घोसाळकर यांचा फोटो वापरू नये खासदार संजय राऊत यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या संदर्भात तीव्र भावना व्यक्त करत शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांवर थेट टीका केली आहे. अभिषेक घोसाळकर हे आयुष्यभर निष्ठावंत शिवसैनिक होते आणि त्यांनी शिवसेनेच्या विचारांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले, असे राऊत म्हणाले. अशा निष्ठावंत शिवसैनिकाच्या पतीचा फोटो वापरून प्रचार करणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे असून, ज्यांनी शिवसेना पक्ष सोडला आहे त्यांनी अभिषेक घोसाळकर यांचा फोटो वापरू नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी उपरोधिक शब्दांत सांगितले की, ज्यांना भाजपची साथ हवी आहे त्यांनी अमित शाह किंवा भाजपच्या नेत्यांचे फोटो लावावेत. अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेच्या विचारधारेशी प्रामाणिक राहिले आणि त्या निष्ठेतूनच त्यांनी बलिदान दिले, त्यामुळे त्यांच्या नावाचा किंवा फोटोचा वापर राजकीय फायद्यासाठी होऊ नये, अशी ठाम मागणी राऊत यांनी केली. पवार एकत्र येऊन भाजपचा पराभव करत असतील तर आमचा पाठिंबा राजकीय समीकरणांवर बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेत जागावाटपाचा कोणताही गंभीर पेच नाही. कार्यकर्ते इच्छुक असतात, मात्र योग्य समजूत काढून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत येईल, यात अडचण नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत, काही ठिकाणी पोलिस गुंड आणि दरोडेखोरांसारखे वागत असल्याचे म्हटले. अशा प्रवृत्तीच्या पोलिसांना गृह खात्याचे संरक्षण मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शरद पवार यांचा स्वतंत्र पक्ष असून, जातीयवादी आणि धर्मांध शक्तींविरोधात त्यांची लढाई सुरू आहे, त्या लढ्यात आम्ही त्यांच्या सोबत होतो, असे राऊत म्हणाले. दोन पवार एकत्र येऊन भाजपचा पराभव करत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, मात्र अजित पवारांना मुंबईत सोबत घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
