मनसे-शिवसेना युतीनंतर उमेदवार निश्चितीला वेग:कल्याण-डोंबिवलीत मनसेनं 50 जागांवर झेंडा रोवला, भाजप-शिवसेना युतीवरून खदखद

मुंबई महानगर परिसरासह राज्यातील पुणे, नाशिक यांसारख्या प्रमुख महापालिकांमध्ये मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये युती जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. युती जाहीर होताच उमेदवार निश्चितीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, अनेक ठिकाणी एबी फॉर्म वाटप, अर्जांची तयारी आणि जागावाटपाचे अंतिम टप्पे गाठले जात आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या काही जागांवर अद्याप चर्चा सुरू असली तरी, त्याआधीच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेने आक्रमक पवित्रा घेत थेट 50 जागांवर दावा ठोकल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मनसेकडून या जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले असून, त्यांना अधिकृत एबी फॉर्मही पाठवण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत एकूण 112 जागा आहेत. यापैकी 50 जागांवर मनसेकडून तयारी पूर्ण करण्यात आली असून, या जागांसाठी उमेदवारांची अंतिम यादी तयार झाली आहे. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी थेट शिवतीर्थावरून उमेदवारांचे अर्ज घेऊन रवाना होत या तयारीला अधिकृत स्वरूप दिले आहे. उर्वरित जागा या ठाकरे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात आल्या आहेत. पुढील 48 तासांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील मनसे उमेदवारांना एबी फॉर्मचे औपचारिक वाटप होणार असून, शेवटच्या दोन दिवसांत सर्व उमेदवार आपले अर्ज दाखल करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या हालचालींमुळे कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीचा प्रचार आणि हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती होणार की दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. युतीसंदर्भात दोन्ही पक्षांच्या समन्वयक समित्यांच्या बैठका सुरू असतानाच, भाजपच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट शिवसेनेसोबत युती नको, स्वबळावरच निवडणूक लढवावी, असा ठाम आग्रह धरला आहे. युती झालीच, तर भाजपला महापौरपदासह स्थायी समितीतील महत्त्वाची पदे मिळाली पाहिजेत, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांची ही भावना उघडपणे मांडल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. भाजपकडून कल्याण-डोंबिवलीत महापौरपद आणि किमान तीन वर्षांसाठी स्थायी समिती सभापती पदाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या मागण्यांवर अंतिम निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. नरेंद्र पवार यांनी सांगितले की, भाजपचे बहुतांश कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत आहेत. युती झाल्यास अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही आणि त्यामुळे नाराजी वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक कार्यकर्ता निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याने, युतीमुळे भाजपचं नुकसान होऊ शकतं, असा दावाही त्यांनी केला आहे. युती झाली, तर बंडखोरीची शक्यता नाकारता येणार नाही आणि त्यातून अंतर्गत संघर्ष वाढू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण अधिक तापत चालले आहे. एका बाजूला मनसे-शिवसेना युतीने उमेदवार निश्चितीला गती दिली असून, प्रत्यक्ष निवडणूक तयारी सुरू केली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप-शिवसेना युतीवरून भाजपमध्येच अस्वस्थता आणि मतभेद उफाळून आले आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे आगामी महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, युती, बंडखोरी आणि स्वबळाच्या निर्णयांमुळे कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण मुंबई महानगर परिसरातील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!