Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

राख अजून शांत झालेली नाही… तरीही आज सुनेत्रा पवारांचा शपथविधी:संजय गायकवाडांची प्रतिक्रिया; खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याशी दर्शवली सहमती

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या आणि वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आज, 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार असून, त्यांच्या शपथविधीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दुःखद घटनेनंतर इतक्या लवकर सत्ता बदलाचा निर्णय झाल्याने राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या शपथविधीवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सूचक आणि भावनिक भाष्य केले आहे. अजित दादांची राख अजून शांत झालेली नाही. इतक्या लवकर अशा घडामोडी होतील, असं वाटलं नव्हतं, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शोक आणि राजकारण यातील ताण पुन्हा एकदा समोर आला आहे. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले की हा निर्णय पवार कुटुंबाचा एकत्रित आणि सामूहिक निर्णय असू शकतो. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, अजित पवारांचीही मानसिकता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निर्णय घेण्याचीच होती, असे गायकवाड यांनी सांगितले. संजय गायकवाड पुढे म्हणाले की, या संपूर्ण प्रक्रियेमागे पवार कुटुंबाचा समन्वय दिसतो. दोन्ही कुटुंबांनी बसून हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पाठीशी भीष्मपितामह म्हणून शरद पवार उभे आहेत, असेही त्यांनी नमूद केले. त्याचवेळी अजित पवारांच्या निधनामागे कोणताही घातपात नसून हा केवळ आणि केवळ अपघात असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. अपघाताबाबत संशय पसरवणाऱ्या चर्चांवर पूर्णविराम देण्याची गरज असल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले. दरम्यान, या विमान अपघाताची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी घेतली आहे. सर्वजण चौकशीची मागणी करत आहेत आणि मीही तीच मागणी करतो, असे ते म्हणाले. अजित पवारांच्या चारित्र्यावर किंवा त्यांच्या प्रतिमेवर कलंक लागेल, अशा चर्चा आता थांबल्या पाहिजेत, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. याच संदर्भात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली असून, हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सिंचन घोटाळ्याशी संबंधित जुन्या आरोपांबाबतही आता नव्याने विचार व्हावा, असे संकेत त्यांनी दिले आहे. दरम्यान, आज होणाऱ्या शपथविधीबाबत आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काहीसा दूर ठेवण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार असून, याबाबतचे अधिकृत पत्र सुनील तटकरे यांनी विधिमंडळाला दिले आहे. आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार या बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. एका बाजूला राज्याने अजित पवारांसारखा प्रभावी नेता गमावला असताना, दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. हा निर्णय केवळ राजकीय नाही, तर भावनिक आणि कौटुंबिक पातळीवरही महत्त्वाचा मानला जात असून, येत्या काळात त्याचे राजकीय परिणाम काय असतील, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!