Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

भाजपने पाठीत खंजीर खुपसला:अजित पवार गटाचा थेट हल्लाबोल; महायुती नावापुरतीच? राष्ट्रवादीच्या जिल्ह्याध्यक्षांनीच मुखवटा फाडला

वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येऊ लागला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट भाजपवर गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी केला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीत एकत्र लढण्याची चर्चा सुरू होती, मात्र प्रत्यक्षात भाजपकडून कोणतीही जागा देण्यात न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा स्पष्ट निर्णय घेतला आहे. या घोषणेमुळे वसई-विरारमधील राजकारणात मोठा स्फोट झाल्याचे चित्र आहे. राजाराम मुळीक यांनी भाजपवर थेट विश्वासघाताचा आरोप करताना सांगितले की, निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या नावाखाली सातत्याने बैठका होत होत्या. या बैठकींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने युतीधर्म पाळत सहभाग घेतला, चर्चा केल्या आणि समन्वयाची भूमिका ठेवली. मात्र प्रत्यक्ष जागावाटपाच्या टप्प्यावर भाजपने एकही जागा न देता आश्वासनांवर पाणी फेरल्याचा आरोप त्यांनी केला. जो पक्ष आपल्या सहकाऱ्यांशी प्रामाणिक राहत नाही, तो मतदारांशीही कधीच प्रामाणिक राहू शकत नाही, असा थेट टोला त्यांनी लगावला. युती केवळ कागदावर होती, प्रत्यक्षात आम्हाला डावलण्यात आले, असेही मुळीक यांनी ठामपणे सांगितले. या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर आणखी एक गंभीर आरोप करत म्हटले की, आमच्या पक्षाची ताकद नसती तर भाजपने आमचे उमेदवार फोडण्याचे प्रयत्न केले नसते. आमचे उमेदवार पळवले गेले, ही बाबच आमच्या पक्षाची ताकद दाखवणारी आहे, असा दावा करत मुळीक यांनी भाजपच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एखादा पक्ष आमच्याशी युती करत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस थांबणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे वसई-विरारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर मैदानात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, यामुळे थेट आणि तीव्र लढतीची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. दरम्यान, वसई-विरारमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही स्वतंत्र वाटचाल करण्याचे संकेत दिले आहेत. ठाकरे गटाने आपल्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्याची घोषणा केल्याने त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सुमारे 100 इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि मनसे यांच्यात संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू होती, मात्र सध्याच्या घडामोडींमुळे त्या चर्चांवरही अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मात्र जागावाटपाची बोलणी पूर्ण झाल्याचे समजते आणि हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. परिणामी, वसई-विरारमध्ये आता बहुपक्षीय, तिरंगी किंवा चौथ्या आघाड्यांची शक्यता अधिक बळावली आहे. राज्यातील सर्वांत चुरशीच्या निवडणुकांपैकी एक ठरणार

वसई-विरार महानगरपालिकेचा राजकीय आणि प्रशासकीय आढावा घेतला असता, येथील निवडणूक अधिक महत्त्वाची ठरणार आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ 28 जून 2020 रोजी संपल्यानंतर विविध कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि महापालिकेत प्रशासक राजवट लागू राहिली. सध्या वसई-विरार महापालिकेत 29 प्रभाग असून एकूण 115 नगरसेवकांची संख्या आहे. यापैकी 58 जागा महिलांसाठी आणि 57 जागा पुरुषांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी प्रत्येकी 5 जागांचे आरक्षण असून त्यातील प्रत्येकी 2 जागा महिलांसाठी राखीव आहेत. उर्वरित 74 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. 2015 च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने 106 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती, भाजपला एक, शिवसेनेला पाच जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नव्हती. या पार्श्वभूमीवर आता बदललेली समीकरणे, फुटलेली युती आणि उघड आरोप-प्रत्यारोप यामुळे वसई-विरारची निवडणूक राज्यातील सर्वांत चुरशीच्या निवडणुकांपैकी एक ठरणार, यात शंका नाही.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!