यंदा केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) 6 जून रोजी तळकोकणात प्रवेश केला. त्यानंतर 8 जूनपर्यंत मान्सूनने रत्नागिरीतील हर्णे, सातारा आणि सोलापूर परिसरापर्यंत मजल मारली. त्यामुळे राज्यभरात लवकरच पावसाची धूम सुरू होईल, अशी आशा होती. मात्र, त्यानंतर मान्सूनची प्रगती पूर्णपणे ठप्प झाली असून महाराष्ट्रातील मोठा भाग अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरात ‘एल निनो’ला पोषक ठरणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पश्चिमी जेट स्ट्रीम नेहमीपेक्षा अधिक दक्षिणेकडे सरकल्याने मान्सूनला गती देणाऱ्या वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे 18 जून उलटली, तरी मान्सून कोकण पट्ट्यातच रेंगाळल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 24 ते 25 जूनपासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबईत पावसाचा जोर वाढेल. तसेच 25 ते 28 जूनदरम्यान किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचे ढग सक्रिय होण्याचे संकेत आहेत. उष्ण व दमट हवेचा ‘येलो अलर्ट’ मुंबई, पालघर, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. पावसाचा ‘येलो अलर्ट’ रायगड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर. पाच महिने देशासाठी धोक्याचे यंदा ऑगस्टनंतर एल निनो सक्रिय होईल असा आधीचा अंदाज होता, मात्र तो आताच सक्रिय झाल्याने बाष्पयुक्त वारे कमकुवत झाले आहेत. जुलै-ऑगस्टमध्ये एल निनो मजबूत होण्याची शक्यता 80 ते 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे जुलै ते नोव्हेंबर हे पुढील पाच महिने देशासाठी अत्यंत आव्हानात्मक असतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याने, जूननंतर देशाच्या अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. मान्सूनची प्रतीक्षा कायम; आज, उद्या उष्णतेची लाट छत्रपती संभाजीनगरकरांची उन्हाच्या कडाक्यामुळे लाहीलाही होत आहे. निम्मा जून महिना उलटून गेला, तरी अद्याप शहराला मान्सून तसेच मान्सूनपूर्व सरींची प्रतीक्षाच आहे. काल (18जून) शहराचे कमाल तापमान 39.2 अंश सेल्सियस नोंदवले गेले. यातच आता हवामान विभागाने आज (शुक्रवार) आणि उद्या (शनिवारी) शहरात पुन्हा उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा दिला आहे. या उष्णतेच्या लाटेच्या कालावधीत शहराचे कमाल तापमान 40 अंशांपर्यंत, तर किमान तापमान 25ते 26 अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोलापूरजवळ अडकला मान्सून सध्या होत असलेला पाऊस हा मान्सूनचा नसून मान्सूनपूर्व आहे. पश्चिमी विक्षोभ आणि हवेत चक्रीय वाऱ्यांचे परिसंचरण सुरू आहे. त्यामुळे दक्षिणेकडून सरकणारा मान्सूनचा प्रवास थांबला आहे. सोलापूरपर्यंत मान्सूनचे ढग येत असले, तरी ते पुढे सरकत नसल्याने मान्सूनचा पुढील प्रवास लांबणीवर पडला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 20 जूननंतर मान्सूनचा पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे. रवी आंधळे, शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
