बारामतीमध्ये शरद पवार आणि गौतम अदानी एकाच मंचावर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच, शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता, अशी माझी ऐकीव माहिती आहे,” असे सांगत राऊत यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार आणि अदानी यांचे संबंध वैयक्तिक आणि कौटुंबिक असू शकतात, मात्र पक्ष फोडण्यातील अदानींच्या कुटुंबाच्या कथित हस्तक्षेपावर राऊत यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना-मनसे यांच्यातील जागावाटप, काँग्रेसची भूमिका आणि अदानींच्या बारामती दौऱ्यावर भाष्य केले. बारामतीतील या भेटीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. संपूर्ण पवार कुटुंब अदानींच्या स्वागताला हजर असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, मात्र ज्या अजित पवारांनी पक्ष फोडला ते देखील तिथे उपस्थित असल्याने राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोहित पवार यांनी अदानींच्या गाडीचे सारथ्य केल्याबद्दल विचारले असता, या प्रश्नाचे उत्तर रोहित पवारच देऊ शकतील, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले. शिवसेना-मनसेमध्ये कोणताही तिढा नाही “शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागावाटपावरून कोणताही पेच किंवा तिढा निर्माण झालेला नाही. जे काही जागावाटप होईल, ते शिवसेना आणि मनसे या एकाच कुटुंबात राहणार आहे,” अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी युतीमधील वादाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. दादर, माहीम, भांडुप आणि विक्रोळी या जागांवरून दोन्ही पक्षांत वाद असल्याचे वृत्त राऊत यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, “मनसेचे लोक ‘मातोश्री’वर येत असतील तर त्यात नवीन काय? दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप किंवा अन्य गोष्टींवरून कोणताही तिढा किंवा पेच नाहीये. सर्व काही सुरळीत आहे. आमच्यात किती जागा लढवायच्या हा विषयच नाही, हे खुद्द राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. कार्यकर्त्यांची इच्छा असते, त्यांना आम्ही समजवू. ही लढाई मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे आणि आमचे कार्यकर्ते ते समजून घेत आहेत. आज उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ दिले जातील.” काँग्रेस-वंचित युतीचे स्वागत काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर बोलताना राऊत म्हणाले, “जर प्रकाश आंबेडकरांनी ही युती मनापासून स्वीकारली असेल, तर आम्ही त्याचे स्वागतच करू. मुंबईवर मराठी माणसाचा हक्क राहावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच भूमिका होती. प्रकाश आंबेडकर त्याच विचाराने काँग्रेससोबत येत असतील आणि त्यामुळे भाजपचा पराभव होणार असेल, तर आम्हाला नक्कीच आनंद आहे.” राज ठाकरेंमुळे काँग्रेसने युती नाकारली शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुंबईत एकमत का झाले नाही, यावर राऊत यांनी मोठा खुलासा केला. “आम्ही काँग्रेसला त्यांच्या हव्या असलेल्या जागा द्यायला तयार होतो. राज ठाकरे यांचीही भूमिका होती की सर्वांनी एकत्र लढावे. मात्र, ‘राज ठाकरे सोबत आहेत म्हणून आम्ही येणार नाही’, ही काँग्रेसची भूमिका चुकीची होती. आमचे मुख्य उद्दिष्ट भाजपच्या ‘राक्षसी’ प्रवृत्तीचा पराभव करणे हे होते,” असे संजय राऊत म्हणालेत.
