एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून संताप व्यक्त करत प्रकाशकाला थेट फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाचे वारे वाहू लागले आहेत. सोशल मीडियावर या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. शिवाजी महाराजांविषयी अनादर केल्याचा आरोप करत गायकवाड यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे बिनीचे शिलेदार राहिलेले सुप्रसिद्ध विचारवंत आणि कम्युनिस्ट कार्यकर्ते गोविंद पानसरे यांनी सुमारे 37 वर्षांपूर्वी ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाच्या शीर्षकावरूनच आक्षेप घेत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केला. या संभाषणात त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. शिवाजी महाराजांविषयी असा उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. घरात घुसून मारेन फोनवरील संभाषणात गायकवाड यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी प्रकाशकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही सांगितले जात आहे. तुला घरात घुसून मारेल, चिरडून टाकेल, जीभ कापेल, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती आहे. या विधानांमुळे प्रकरण गंभीर बनले असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. पुस्तक वाचण्याचा सल्ला प्रकाशक प्रशांत आंबी यांनीही या प्रकरणात आपली बाजू मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, हे पुस्तक त्यांनी लिहिलेले नसून प्राध्यापक गोविंद पानसरे यांचे आहे. तसेच हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झाले असून त्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी गायकवाड यांना आधी पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही समोर आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा या वादात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, प्रकाशक प्रशांत आंबी यांनी गायकवाडांच्या धमक्यांना घाबरून न जाता ठाम भूमिका घेतली. तुम्ही उद्या या आणि माझी जीभ कापा, असे उत्तर देत त्यांनी प्रतिकार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा वाद केवळ राजकीय न राहता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरही केंद्रित होताना दिसत आहे. व्हिडिओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दरम्यान, या प्रकरणावर वाढता दबाव पाहता संजय गायकवाड यांनी नंतर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, त्यात त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केल्याचे दिसते. या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबाबतची संवेदनशीलता आणि त्यावरून होणारे राजकीय वाद चर्चेत आले आहेत. पुढील काळात या प्रकरणावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पानसरेंची झाली हत्या कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांची 16 फेब्रुवारी 2015 रोजी अज्ञात इसमानी गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले. या हल्ल्यातील उपचारादरम्यान गोविंद पानसरे यांचे 20 फेब्रुवारी 2015 रोजी निधन झाले. ही हत्या सनातन संस्थेच्या संबंधितांनी केल्याचे आरोप झाले. त्यानंतर समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, भरत कुरणे आदींना अटक झाली. ते जामीनावरही बाहेर आले. मात्र, हत्येचे गूढ अजून उलगडले नाही. पानसरेंच्या पुस्तकात नेमके काय? छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन सर्व पक्षांकडून जोरदार राजकारण केले जाते. प्रत्येक जण शिवाजी महाराजांवर दावा सांगतो. त्यांच्या कार्याचे आपापल्या सोयीने अर्थ काढतो. मात्र, राजे होते कसे? त्यांच्या कामाकडे डोळसपणे कसे पाहावे? हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या 73 पानांच्या छोटेखानी पुस्तकातून मांडले आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक लिहिताना त्यांनी रियासतकार गो. स. सरदेसाई, प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, नरहर कुरुंदकर अशा प्रज्ञावंतांच्या विचारांचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. तेव्हा अस्मिता कुठे गेली होती?-श्रीकांत देशमुख साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी आणि ज्येष्ठ लेखक श्रीकांत देशमुख यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या धमकीबद्दल खंत व्यक्त केली. कवी श्रीकांत देशमुख दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना म्हणाले की, ‘संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधःपतन आहे. आपल्याला प्रबोधनाची थोर परंपरा आहे. मुळात ज्यांना शिवाजी महाराज, त्यांची धोरणे, त्यांची राजकीय आणि सांस्कृतिक भूमिका माहित नसते, ते अशा प्रकारे वागतात. भगतसिंह कोश्यारी, कोरटकर यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला. तेव्हा या संजय गायकवाड यांची अस्मिता कुठे गेली होती? त्यांनी चुकीच्या अस्मितांचे राजकारण करू नये. आपण माझी आई, माझा बाप, माझा विठ्ठल तुकोबा म्हणतो. या साऱ्यांचा एकेरी उल्लेख करतो. या एकेरी उल्लेखामध्ये आत्मियता असते. रियासतकार सरदेसाई ते महात्मा फुल्यांपर्यंत अनेकांनी शिवाजी महाराजांचा आत्मियपणे एकेरी उल्लेख केला आहे. मात्र, त्यांच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा करणे योग्य नाही.’ संबंधित वृत्त जागतिक पुस्तक दिनी चर्चेत आलेल्या गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’मध्ये नेमके काय; जाणून घेऊ…! रोहिणी खडसे म्हणाल्या- संभ्रम निर्माण करण्यात सत्ताधाऱ्यांची PhD; संजय गायकवाडवर गुन्हा दाखल करा- विजय वडेट्टीवार