अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गुरुवारपासून गायब झालेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना त्यांचा अद्याप त्यांच्या कुटुंबीयांशी व पक्षनेत्यांशी कोणताही संपर्क झाला नाही. त्यामुळे ते कुठे गेले? व त्यांचा संपर्क का होत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. 68 सदस्यीय अहिल्यानगर महापालिकेसाठी येतत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. त्यानंतर 16 तारखेला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. अर्ज मागे घेण्याच्याप हिल्या दिवशी 28 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यात आज पुन्हा अधिकची भर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे 2 उमेदवार गुरुवारपासून बेपत्ता झालेत. ते कुठे गेलेत? याची कोणतीही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना व नेत्यांना नाही. केडगावचा इतिहास रक्तरंजित यासंबंधीच्या माहितीनुसार, राहुल जाधव व अंबरनाथ भालसिंग अशी गायब झालेल्या मनसेच्या उमेदवारांची नावे आहेत. हे दोघेही प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार आहेत. ते कालपासून बेपत्ता झालेत. तेव्हापासून त्यांचा कोणताही संपर्क त्यांच्या कुटुंबीयांशी झाला नाही. ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्याही संपर्कात नाहीत. त्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल केला नाही. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी या कार्यकर्त्यांच्या गायब होण्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. केडगावचा इतिहास हा रक्तरंजित आहे. त्यामुळे बेपत्ता झालेल्या उमेदवारांचे कुटुंबीय जसे काळजी पडले आहे, तसे आम्हीही काळजीत पडलो आहोत. या प्रकरणी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोलिस प्रशासनाच्या संपर्कात आहेत. पण ही मनसे आहे. आमच्या अंगावर याल तर आम्ही शिंगावर घेऊ, असा इशारा सचिन डफळ यांनी केला आहे. अहिल्यानगरच्या राजकारणात मोठे बदल उल्लेखनीय बाब म्हणजे 2018 च्या महापालिका निवडणुकीनंतर अहिल्यानगरच्या राजकीय समीकरणांत मोठा बदल झाला आहे. शहराच्या राजकारणात प्रभावी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मधल्या काळात फूट पडली आहे. यामुळे महापालिकेचे राजकीय चित्र बदलले आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित पवार गटाचे, तर शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटाकडे गेलेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील या दोन्ही गटांच्या प्रतिस्पर्धी गटांची म्हणजे शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटांकडे नाममात्र नगरसेवक उरलेत. पण असे असले तरी महाविकास आघाडीने या निवडणुकीसाठी नव्या जोमाने तयारी केली आहे. अजित पवार गटाचे 2 उमेदवार बिनविरोध महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कुमारसिंह वाकळे व प्रकाश भागानगरे हे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. या दोघांच्या विरोधातील इतर उमेदवारांचे अर्ज एकतर बाद झालेत किंवा त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या दोघांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. कुमार सिंह वाकळे हे प्रभाग क्रमांक 8 ड मधून निवडून आलेत. तर प्रकाश भानागरे हे प्रभाग क्रमांक 14 अ मधून बिनविरोध निवडून आलेत. वाकळे व भागानगरे हे यापूर्वीही नगरसेवक होते.
