Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचातरी दबाव असल्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर पवार कुटुंब आक्रमक झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, संबंधित कंपन्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. त्यांच्या भूमिकेला आता अजित पवार यांचे दुसरे पुतणे युगेंद्र पवार यांनीही जोरदार पाठिंबा दिला आहे. दोघेही मिळून व्हीएसआर कंपनीविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी दोघेही बारामती पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. मात्र, पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला नाही. त्यानंतर रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले. समर्थकांनीही जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी रोहित पवार यांनी देशातील कोणत्याही नागरिकाला एफआरआय दाखल करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. एफआरआय दाखल करण्यास नकार देण्यात आल्याने रोहित पवार यांनी संबंधीत विमान कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणात दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांवर कोणाचातरी दबाव रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी घातपाताची शक्यता व्यक्त करत तपास यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी DGCA,सीआयडी आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत VSR कंपनीला वाचवण्याचा व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर रोहित पवार मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथेही गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचे सांगितले. एफआयआर नोंदवण्याच्या मागणीवरून पोलिस अधिकारी आणि पवार यांच्यात वाद झाला. माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, DGCAच्या परिपत्रकात VSR कंपनीच्या 25 पैकी 5 विमाने थांबवण्याचे आदेश दिल्याने संशय अधिक बळावला असून नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, पोलिसांवर कोणाचातरी दबाव असल्याचे जाणवत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. डीजीसीएचा अहवाल- व्हीएसआर कंपनीकडून काही नियमांचे उल्लंघन बारामतीत आज मोठी घडामोड घडली. शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार आणि बारामती पोलिस ठाण्यातील पोलिसांमध्ये तीव्र वाद झाले. आज बारामतीत जवळपास दोन तास ते पोलिस ठाण्यात थांबून होते, तरीही गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. रोहित पवार म्हणाले की, 24 फेब्रुवारीचा डीजीसीएचा अहवाल सर्वांनी पाहिला आहे. 28 जानेवारीच्या घटनेनंतर आलेल्या या अहवालात व्हीएसआर कंपनीकडून काही नियमांचे पालन झाले नसल्याचे नमूद आहे. त्यामुळे निष्काळजीपणातून हा अपघात घडल्याचे संकेत मिळतात. या आधारे एफआयआर व्हावा, म्हणून आम्ही आधी मुंबईत प्रयत्न केला. मंत्रालयाजवळील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जाऊन आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, असे त्यांनी सांगितले. कलम 173 (1) अंतर्गत प्रत्येकाला एफआयआरचा अधिकार एफआयआर कुठेही करता येतो, असा दावा करत त्यांनी बीएनएसएस 2023 मधील ‘झिरो एफआयआर’ संकल्पनेचा उल्लेख केला. देशातील कोणताही नागरिक कुठल्याही ठिकाणी गुन्हा नोंदवू शकतो आणि तो संबंधित ठिकाणी वर्ग करता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले. कलम 173 (1) अंतर्गत प्रत्येकाला एफआयआर करण्याचा अधिकार आहे, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले. बारामतीत गर्दी होऊ नये म्हणून मी आधी मुंबईत प्रयत्न केला. पण तेथे तक्रार स्वीकारली नाही. आता इथेही नकार दिला जात आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. खराब विमान दादांना कसे देण्यात आले? चुकून की मुद्दाम? व्हीएसआर कंपनीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजित दादा ज्या लेयर जेट 45 एक्सआर विमानाने प्रवास करत होते, ते या कंपनीकडे होते. अशा प्रकारची सात विमाने कंपनीकडे होती. त्यापैकी एकातून प्रवास करताना दुर्घटना घडली. 2023 मध्येही मुंबईत एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यानंतर उरलेली पाच विमाने डीजीसीएने 24 तारखेच्या आदेशानुसार उड्डाणास बंदी घातली. जर पाचही विमाने थांबवली, तर खराब विमान दादांना कसे देण्यात आले? चुकून की मुद्दाम? या प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. कोणत्या अधिकाऱ्यांनी विमान सुरक्षित असल्याचे प्रमाणित केले? हा एफआयआर व्हीएसआर कंपनी, तिचे मालक आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात असावा, अशी मागणी त्यांनी केली. विमान उड्डाणास योग्य आहे की नाही, याची जबाबदारी डीजीसीएची असते. कोणत्या अधिकाऱ्यांनी विमान सुरक्षित असल्याचे प्रमाणित केले? कोणी सही केली? त्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच अॅरो नावाच्या कंपनीकडे नियोजनाची जबाबदारी होती. त्यांच्या खासगी व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ‘वेदर ओके’ असल्याचे सांगण्यात आले. त्या माहितीवरून अजित दादा प्रवासाला निघाले. त्या ग्रुपमधील अधिकारी आणि संबंधित सर्वांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. मंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही केंद्रीय उड्डाण मंत्र्यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. व्हीएसआर कंपनीशी कोणतेही व्यावसायिक संबंध असतील, तर संबंधित मंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे त्यांनी म्हटले. मात्र, एफआयआरमध्ये मंत्र्यांचे नाव घेतलेले नाही, कारण आम्हाला राजकारण करायचे नाही. हा आमचा नागरिक म्हणून आणि कुटुंब म्हणून हक्क आहे. पोलिसांनी तो स्वीकारायलाच हवा, असे ते म्हणाले. मात्र, अपघाताचा रिपोर्ट आधीच नोंदवला असल्याचे सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले. तपासात ठोस प्रगती दिसत नाही एफआयआर का घेतला जात नाही, असा थेट सवाल करत त्यांनी अभिनेता सुषांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूचा उल्लेख केला. ते महाराष्ट्राचे नव्हते, तरी त्यांच्या प्रकरणात मोठी चौकशी झाली. मग अजित दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या मृत्यूबाबत एफआयआर का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. घटनेला महिना होत आला, तरी तपासात ठोस प्रगती दिसत नाही. तपासावर दबाव असल्यानेच दिशा चुकते आहे का, असा आरोप करत त्यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी पुन्हा एकदा केली.
युगेंद्र पवार यांनी भावनिक अपघाताच्या दिवशी घडलेला घटनाक्रम सांगताना युगेंद्र पवार यांनी भावनिक शब्दांत अनुभव मांडला. मीच सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचलो. बारामती विमानतळावर गेल्यावर सुरुवातीला काहीच दिसत नव्हते. त्यामुळे मी गाडी थेट रनवेवर नेली. 11 नंबर रनवेच्या टोकाला सुमारे 50 फूट खाली विमान कोसळलेले दिसले, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, विमान पूर्णपणे जळून खाक झाले होते. संपूर्ण दृश्य धक्कादायक होते. दरम्यान, रोहित पवार यांनी याआधी मुंबईतील मरीन लाईन पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिथे तक्रार नोंदवली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता बारामतीत औपचारिक तक्रार देण्याचा निर्णय घेतला असून युगेंद्र पवारही त्यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. व्हीएसआर कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची त्यांची मागणी आहे. जनहित याचिका उच्च न्यायालयात सादर दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन पातळीवरही हालचाल सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताबाबत सीआयडीकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली होती. मात्र अपघाताची कारणे आणि त्यामागील जबाबदारी निश्चित व्हावी, यासाठी स्वतंत्र चौकशीची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगामार्फत याचिकेत काही गंभीर दावे करण्यात आले आहेत. अजित पवार मूळतः गाडीने बारामतीला जाणार होते. मात्र ऐनवेळी एका खासदाराचा फोन आला आणि त्यांना व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास करण्यास प्रवृत्त करण्यात आले, असा दावा करण्यात आला आहे. तसेच ज्यांना मूळ कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आले होते, ते दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकले होते आणि त्यांचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हीएसआर कंपनीवर युरोपमध्ये बंदी असल्याचा दावा याचिकेत आहे. भारतात या कंपनीची अधिकृत नोंदणी नसताना तिचे विमान कसे उडाले, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या सर्व बाबींची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगामार्फत व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायालयातही चौकशीसाठी दबाव एकीकडे पवार कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे न्यायालयातही चौकशीसाठी दबाव वाढत आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, यात कोणाची निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष होते का, याबाबत स्पष्टता येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. व्हीएसआर कंपनीविरोधात कारवाईची मागणी, सीआयडी चौकशीचे निर्देश आणि स्वतंत्र आयोगाची स्थापना या सर्व मागण्यांमुळे हे प्रकरण आणखी गंभीर बनले आहे. आगामी काही दिवसांत पोलिसांची भूमिका, राज्य सरकारची भूमिका आणि न्यायालयीन सुनावणी याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या मृत्यूमागील सत्य बाहेर येईल का, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांनाही पडू लागला आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!