आपल्या स्वतःतील परमेश्वर ओळखला‎ की चित्तवृत्ती शांत होते- रामेश्वर महाराज‎:चारीधाम यात्रा पूर्ण केलेल्या भाविकांच्या स्वागतार्थ गंगापूजन, कीर्तन सोहळा‎

प्रतिनिधी | कन्नड चराचरातच नव्हे तर प्रत्येकात परमेश्वर आहे तो ओळखण्याची गरज आहे. एकदा का तो ओळखला की सैरभैर झालेल्या चित्तवृत्ती आपोआप शांत होतात, असे प्रतिपादन रामेश्वर महाराज यांनी भिल्ल पलटण येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात केले. भिल्ल पलटण येथे चारीधाम यात्रा पूर्ण करून आलेल्या भाविकांच्या स्वागतार्थ गंगापूजन व भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. चारीधाम यात्रा करून आलेले भाविक गोरखनाथ पुंजाबा पाटील आल्हाड, निर्मलाबाई गोरखनाथ पाटील आल्हाड, केशवराव रामराव राजापुरे, रुक्माई केशवराव राजापुरे, सरस्वतीबाई शामराव राजापुरे, जिजाबाई विश्वनाथ आल्हाड, वच्छलाबाई काशिनाथ आल्हाड यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यांच्या स्वागतार्थ आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमात भागवताचार्य रामेश्वर महाराज यांनी आपल्या वाणीतून भक्तिरसपूर्ण कीर्तन सादर केले. त्यांच्या प्रभावी निरूपणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. हरिनामाच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात परिसर भक्तिमय झाला होता. या कार्यक्रमाला भाजप नेते, उद्योजक मनोज केशवराव पवार यांनी उपस्थित राहून चारीधाम यात्रा करून आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत केले. यावेळी आपल्या मनोगतात मनोज पवार म्हणाले की, चारीधाम यात्रा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी केलीच पाहिजे. विशेषतः तरुणपणी ही यात्रा केल्यास कठीण व अवघड वाटणारी यात्रा अधिक सोपी आणि आनंददायी ठरते. चारधाम यात्रेमुळे आध्यात्मिक समाधान मिळते तसेच जीवनाला सकारात्मक दिशा मिळते. कार्यक्रमाला रोहिदास पाटील, पवन ठाकूर, नाना वाळुंजे, किशोर वाघ, साईनाथ आल्हाड, आकाश बोलधने यांच्यासह परिसरातील नागरिक, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!