महापालिका निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असताना राजकीय लढाई आता थेट सोशल मीडियावर उतरल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, या डिजिटल रणांगणात मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी वैयक्तिक हल्ले, बदनामी आणि जुन्या व्हिडिओंच्या आधारे राजकारणाची पातळी घसरताना पाहायला मिळत आहे. पुण्यातील भाजप उमेदवार पूजा मोरे यांच्या जुन्या व्हिडिओंच्या माध्यमातून सुरू असलेल्या ट्रोलिंगमुळे वातावरण तापले असून, या प्रकारावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी या ट्रोलिंगविरोधात उघड भूमिका घेत, संबंधितांना गंभीर इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवारांच्या कामगिरी, धोरणे आणि जनतेसाठी असलेल्या भूमिकांवर चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या घडीला सोशल मीडियावर जुने व्हिडिओ, पूर्वीची वक्तव्ये आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित बाबी उकरून काढून उमेदवारांना लक्ष्य करण्याचा प्रकार वाढताना दिसतो आहे. पूजा मोरे यांच्या बाबतीतही हाच प्रकार घडत असून, त्यांच्या जुन्या व्हिडिओंचा आधार घेत त्यांच्यावर टीका, टीपण्णी आणि ट्रोलिंगचा मारा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी या प्रवृत्तीवर कडाडून टीका करत, अशा राजकारणामुळे लोकशाहीची प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याचे स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी निवडणुकीतील या नव्या सोशल वॉरवर रोखठोक मत व्यक्त केले. निवडणुकीच्या काळात जुने व्हिडिओ उकरून काढून एखाद्या उमेदवाराला टार्गेट करणे हे अत्यंत चुकीचे आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, विचारधारांची लढाई होऊ शकते; पण एखाद्याची जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी खालच्या पातळीवर जाणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले. राजकीय विरोध असला तरी मानवी सन्मान आणि सामाजिक भान जपले गेले पाहिजे, असे मत त्यांनी ठामपणे मांडले. पूजा मोरे यांच्या व्हायरल व्हिडिओंवरून सुरू असलेल्या ट्रोलिंगवर बोलताना जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले. त्यांनी थेट इशारा देत सांगितले की, जर असे घाणेरडे प्रकार तात्काळ थांबवले नाहीत, तर त्याचे गंभीर दुष्परिणाम संबंधितांना भोगावे लागतील. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा आमचा स्वभाव आणि धर्म असल्याचे सांगत, सोशल मीडियावर चालणाऱ्या बदनामीच्या मोहिमेला कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या ट्रोलर्समध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसत आहे. या प्रकरणात विशेष बाब म्हणजे, मनोज जरांगे पाटील हे भाजप किंवा सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी ओळखले जातात. मात्र, यावेळी त्यांनी भाजप उमेदवार पूजा मोरे यांच्यावर होत असलेल्या वैयक्तिक हल्ल्यांना विरोध करत, महिला सन्मानाचा मुद्दा ठळकपणे पुढे आणला आहे. राजकीय मतभेद वेगळे असू शकतात, पण महिलांच्या चारित्र्यावर, प्रतिमेवर किंवा वैयक्तिक आयुष्यावर हल्ले करणे अक्षम्य असल्याचे मत अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे. जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे हा मुद्दा केवळ पक्षीय न राहता सामाजिक स्वरूपाचा बनत चालल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. निवडणुकीचे मुद्दे बाजूला पडण्याची भीती दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे पुणे आणि नाशिकसह राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. महापालिका निवडणुका जवळ येत असताना सोशल मीडियावरून सुरू झालेला हा संघर्ष प्रत्यक्ष राजकीय रणांगणात कोणते परिणाम घडवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ट्रोलिंग, आरोप-प्रत्यारोप आणि इशाऱ्यांची भाषा वाढल्यास निवडणुकीचे मुद्दे बाजूला पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता राजकीय पक्ष आणि नेत्यांनी जबाबदारीने वागण्याची गरज अधोरेखित होत आहे. या संदर्भात खालील बातमी देखील वाचा…. ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाची ठिणगी:अती केली की माती होते, पूजा मोरेंच्या माघारीनंतर लक्ष्मण हाके आक्रमक; म्हणाले- हा ट्रेलर पुण्यात भाजप उमेदवार पूजा मोरे यांच्या माघारीनंतरचा वाद आता स्थानिक राजकारणाच्या चौकटीबाहेर जात राज्यव्यापी सामाजिक संघर्षाचं रूप घेताना दिसत आहे. या प्रकरणात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत, अती केली की माती होते, असा इशारा दिला आहे. पूजा मोरे हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, असं म्हणत त्यांनी पुढील राजकीय लढ्याचे संकेत दिले असून, ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर गप्प बसणार नसल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. पूर्ण बातमी वाचा…..
