क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी म्हणजेच नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. “नायगावचे नामांतर सावित्रीबाईंच्या नावाने करावे अशी मागणी होत आहे; जर ग्रामसभेने तसा ठराव दिला, तर राज्य मंत्रिमंडळ एका मिनिटात त्याला मंजुरी देईल,” असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नायगावचे नामांतर क्रांताीज्योती सावित्रीनगर करण्याची मागणी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नायगावच्या ग्रामसभेने तसा निर्णय घ्यावा आणि तो प्रस्ताव मंत्री जयकुमार गोरे यांच्यामार्फत सरकारकडे पाठवावा. असा प्रस्ताव आल्यास आमचे मंत्रिमंडळ विनाविलंब त्याला विनाविलंब मंजुरी देईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. एका वर्षात घोषणा ते कामाची सुरुवात मुख्यमंत्री म्हणाले की, मागील वर्षी याच दिवशी मी नायगावला आलो होतो आणि १० एकर जागेवर स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या कामाची जबाबदारी मी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली होती. “घोषणेच्या एका वर्षाच्या आत जागा मिळणे, आराखडा मंजूर होणे आणि प्रत्यक्ष कामाचे टेंडर निघून सुरुवात होणे, असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. जयकुमार गोरे यांनी रेकॉर्ड स्पीडमध्ये हे काम पूर्ण करून दाखवले आहे,” असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले. महाराष्ट्रात ५० लाख पेक्षा जास्त लखपती दीदी सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना केवळ स्मारक बांधणे हा आमचा हेतू नाही, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे आमचे लक्ष्य आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आता केवळ स्मारक करणार नाही, तर महिलांना अधिकारिता देण्यासाठी, ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, त्या सगळ्या गोष्टी याठिकाणी असतील. त्याचे प्रशिक्षण याठिकाणी असेल. ग्रामविकास आणि महिला बाल कल्याण खात्याने मिळून लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचे ठरवले आहेत. लाडक्या बहिणींना सक्षम करणे ही आमची जबाबदारी आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात ५० लाख पेक्षा जास्त लखपती दीदी आपण केल्यात. आता यावर्षी १ कोटी पर्यंत आपण पोहोचू. सातारा जिल्ह्यात देखील दीड लाख लाडक्या बहिणी या लखपती दीदी झालेल्या आहेत.” नामांतराच्या निर्णयासाठी मंत्रिमंडळ सज्ज नामांतराच्या मुद्द्यावर अधिक स्पष्टपणे बोलताना फडणवीस म्हणाले की, “महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न आम्ही करू. नायगावचे नामांतर सावित्रीबाईंच्या नावाने करण्याची मागणी आलेली आहे. या ग्रामसभेने असा निर्णय घेतला आणि जयकुमार गोरेंनी ग्रामविकास विभागाच्या मार्फत माझ्यापर्यंत पाठवला तर, विनाविलंब आमचे मंत्रिमंडळ एका मिनिटात त्याला मान्यता देईन आणि नायगावचे नाव सावित्रीआईंच्या नावाने करण्याचा निर्णय करू”, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
