कोल्हापूर शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तिणीचा वनतारातून परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. एक वर्षानंतर ती परत येणार आहे. गुजरातमधील वनताराचे पथक सोमवारी नांदणीत दाखल झाले. कोल्हापुरात दाखल पथकाने माधुरीसाठी उभारण्यात येत असलेल्या पुनर्वसन केंद्राची पाहणी केली. २८ जुलै २०२५ रोजी तिला वनतारात नेण्यात आले होते. माधुरीला वनतारात नेण्यास कोल्हापुरात मोठा विरोध झाला होता. आंदोलनेही झाली होती. काय होता वाद? पेटा इंडियाने हत्तिणीच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर १६ जुलै रोजी मुंबई हायकोर्टाने माधुरीला वनतारात हलवण्याचा आदेश दिला होता. सुप्रीम कोर्टानेही हा आदेश कायम ठेवला होता.
माधुरी हत्तीण ३० जुलै २०२५ रोजी वनतारामध्ये आली होती. त्यावेळी तिला दीर्घकाळ सुश्रुषा करण्याची आणि मोठ्या पशुवैद्यक उपचारांची गरज होती. तिच्या दोन्ही पावलांना अनेक जखमा झाल्या होत्या तसेच तिच्या पायाला आणि हाडांना देखील हानी पोहोचली होती. ती वनतारा मध्ये आली तेव्हा तिला पायांना अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. तसेच तिच्या पायाचे स्नायू व कातडी यांचीही अवस्था खराब होती. इथे आणण्यापूर्वीच तिला काही जखमा देखील झाल्या होत्या. वनतारामध्ये तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे उपचार झाले आणि तिची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेण्यास सुरुवात झाली. तिच्या शारीरिक जखमांवर उपचार सुरू झालेच पण तिचे वागणे पूर्ववत व्हावे, ती लोकांमध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये मिसळावी, पर्यावरणाशी तिने जुळवून घ्यावे आणि तिचे एकंदर जीवनमान आणि आरोग्यमान सुधारावे यासाठी प्रयत्न करण्यात आले. तिची सुश्रुषा करणाऱ्या पथकामध्ये पशुवैद्य, हत्तींची काळजी घेण्यातील विशेषतज्ञ, जीवशास्त्रज्ञ, प्राणी कल्याण अधिकारी, आहार तज्ञ, प्राण्यांची वर्तणूक ओळखणारे तज्ञ असे अनेक निष्णात लोक होते. त्यांनी तिला बरे करण्यासाठी परिस्थितीवर आधारित एक सर्वंकष आराखडा तयार केला. तब्येतीत सुधारणा आणि अस्थिरोग बरा झाला गेले वर्षभर तिच्या अनेक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. रेडिओग्राफिक चाचण्या घेऊन त्यांचे परिणाम पाहण्यात आले. तिची हालचाल आता लक्षणीयरीत्या सुधारली असून ती आपल्या शरीराचे वजन देखील व्यवस्थित पेलत आहे आणि तिच्या स्नायूंची हालचालही व्यवस्थित होत आहे असे त्यातून आढळून आले आहे. यापूर्वी तिची हाडे जिथे कमकुवत होती ती आता एकसंध झाली असून त्यांची फ्रॅक्चरही भरून निघाली आहेत आणि त्यांची रचना देखील व्यवस्थित स्थिर झाली आहे, असे रेडिओग्राफिक इमेजिंग वरून दिसून आले. तसेच तिच्या जखमा भरून आल्या आणि पायात अंतर्गत झालेली स्नायूंची हानीही भरून आल्याचे दिसले. त्यानुसार माधुरी हत्तीणीची सध्याची आरोग्य विषयक अवस्था ही वैद्यकीय दृष्ट्या स्थिर, कार्यक्षम आणि सुधारत असलेली अशी आढळून आली आहे. अर्थात तिच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वी तिच्या पायांच्या हाडांची गंभीर अवस्था आणि त्याचा कालावधी पाहता तिच्या हाडांच्या अवस्थेवर आणखी दीर्घकाळ देखरेख करावी लागणार आहे. तिची सध्याची सुश्रुषा खालील प्रमाणे केली जात आहे. तिच्या पावलांची तसेच पायाची काळजी घेण्यासाठी विशेष उपचार. यात तिच्या नखांची काळजी घेण्यात आली, तिचे खुर, तळवे, नखे आवश्यक तिथे कापून त्यांची निगा राखण्यात आली. तिच्या पायांचे आरोग्य व्यवस्थित राहावे व त्यांना काही आजार होऊ नये यासाठी अँटीसेप्टिक देण्यात आली. तसेच आणखी काही वैद्यकीय उपचारही करण्यात आले.तिच्या संपूर्ण पायाची अवस्था सुधारते आहे का, हे तपासण्यासाठी ठराविक कालाने तिच्या रेडियो ग्राफिक चाचण्या घेण्यात आल्या. तिची हाडे आणि हाडांना जोडणारे सांधे बळकट व्हावेत यासाठी पोषक आहार देण्यात आला. पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली तिची हाडे बळकट करण्यासाठी तिला मोठा व्यायामाही देण्यात आला. हायड्रोथेरेपी आणि अन्य काळजी वर्षभर तिला रोज ठरवलेली हायड्रोथेरेपी देण्यात आली. माधुरीची निगा राखण्यातील ती प्रमुख उपचार पद्धती होती. तिची हाडे जोडणाऱ्या सांध्यांवरील ताण कमी व्हावा तसेच रक्ताभिसरण व्यवस्थित व्हावे, स्नायूंची लवचिकता वाढावी, स्नायू बळकट व्हावेत, त्यांच्यातील ताकद वाढावी आणि त्यांची हालचाल चांगली व्हावी यासाठी तिच्याकडून काही व्यायाम पाण्यात देखील करून घेण्यात आले. हाडांशी संबंधित मोठ्या आजारांवर केवळ औषधे किंवा शस्त्रक्रिया यावरच अवलंबून न राहता दीर्घकाळ सुश्रुषा करणे हाच चांगला उपाय आहे, या आधुनिक हत्तीवैद्यक शास्त्रातील मान्यतेला अनुसरूनच हे उपचार करण्यात आले. पोषक आहार माधुरीला रोज साधारण १८० किलो ताजे हिरवे गवत देण्यात आले. त्याचबरोबर फळभाज्या, जीवनसत्वे, झाडपाला, खनिजे आणि अन्य पोषक औषधे तिला देण्यात आली. तिला मिळालेल्या पोषक आहारामुळे तसेच तिची व्यवस्थित काळजी घेतल्यामुळे या काळात तिचे वजन स्थिर राहिले. पशुवैद्यक तज्ञांनी तिची योग्य काळजी घेतल्याने तिच्या रक्तातील घटकही अन्य निरोगी पशूंएवढेच व्यवस्थित होते. वर्तणूक सुधारणे आणि पर्यावरणाशी जुळवून घेणे फक्त आरोग्य विषयक निकष पूर्ण केले म्हणजेच रुग्ण संपूर्णपणे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या व्यवस्थित झाला असे नसते हे आधुनिक पशुवैद्यक शास्त्र मानते. त्यानुसार रुग्णाची वर्तणूक, त्याचे आकलन तसेच त्या प्राण्याची योग्य वागणूक या घटकांचा विचारही उपचारांमध्ये करावा लागतो. त्यानुसार माधुरीच्या तब्येतीत सर्व अंगाने सुधारणा व्हावी यासाठी तिच्या सर्वंकष उपचारात खालील बाबी करण्यात आल्या.तिला जंगलात फिरायला नेऊन पर्यावरणाशी ओळख करून देण्यात आली.तिचे जंगल विषयक आणि वनस्पती विषयक आकलन वाढण्यासाठी तिला हुंगून झाडपाला शोधण्याची व खाण्याची संधीही देण्यात आली. तिचे वासाचे ज्ञान वाढवण्यासाठी विशेष बाबी करण्यात आल्या. तिच्या शरीराचे तापमान थंड रहावे यासाठी तिला पाण्यात खेळवण्यात आले. तिला विश्रांतीसाठी आणि तिच्या हालचाली व्यवस्थित व्हाव्यात यासाठी तिला मातीच्या जमिनीवर झोपवणे, धुळीचे स्नान, चिखलाचा लेप, चिखलात लोळवणे आदी गोष्टीही करण्यात आल्या. हत्ती जेव्हा जंगलातील नैसर्गिक अधिवासातील हत्तींप्रमाणे वागू लागतो तेव्हा त्याचे त्याच्यावरील उपचार आणि काळजी यशस्वी झाली असे मानले जाते. अन्य हत्तींशी मैत्री माधुरीच्या उपचारातील सर्वात महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे वनतारा मधील अन्य हत्तींशी तिची जवळीक आणि मैत्री करून देणे. हत्ती हा कळपात एकत्र राहणारा आणि सामाजिक बांधिलकी मानणारा प्राणी आहे. त्यांची इतर हत्तींविषयी मैत्री आणि त्यांचे सामाजिक बंध हे त्यांच्या दीर्घकालीन हिताशी जोडलेले असतात. माधुरी आता अन्य हत्तींबरोबर रोज जंगलात फिरणे, अन्न शोधणे, खाणे, पाण्यात खेळणे यात सहभागी होते. माधुरी इतर हत्तींमध्ये किंवा इतर प्राण्यांमध्ये मिळून मिसळून राहावी, त्यांच्या भाषेत त्यांचा संपर्क व्हावा, त्यांनी एकत्रितरित्या काही गोष्टी कराव्यात आणि त्यांच्यातील मैत्रीचे बंध अजून दृढ व्हावेत या गोष्टींकडे, तिची काळजी घेणाऱ्या पथकाचे लक्ष होते. कारण हे घटक हत्तीच्या भावनिक आरोग्यातील महत्त्वाचे मानक आहेत. तिला कोल्हापूरला परत नेण्याबाबत वर्षभरात व्यवस्थित उपचार झाल्यानंतर माधुरी आता कोल्हापूरला परत जाण्यास सज्ज होत आहे. तिला परत पाठवताना आणखीन एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की तिच्या पायांच्या हाडांची अवस्था पाहता तिला कोल्हापूर पशुवैद्यक तज्ञांची नियमित देखरेख आणि दीर्घकालीन उपचार गरजेचे आहेत. सततची पशुवैद्यकांची देखरेख, नियमितपणे रेडिओग्राफिक तपासणी, पायांची संपूर्ण काळजी, पोषक आहार यांच्या साह्यानेच माधुरीची तब्येत सुधारेल आणि दीर्घकालासाठी ती हलती-चालती आणि व्यवस्थित राहील. वनतारा हा रिलायन्स फाउंडेशन चा उपक्रम असून तो अडचणीत सापडलेल्या वन्य जीवांची सुटका करणे, त्यांचे पुनर्वसन करणे, त्यांची काळजी घेणे, त्यांच्यावर उपचार करणे यात तज्ञ आहे. सर्वोत्तम पशुवैद्यक उपचार, प्राणी कल्याण शास्त्र, वैद्यक शास्त्राच्या साह्याने प्राण्यांचे संवर्धन, गरज असलेल्या प्राण्यांच्या परिस्थितीनुसार त्यांचे पुनर्वसन या हेतूने वनतारा तर्फे कामे केली जातात.
