राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यावेळी राज्यसभेवर निवडून जाण्याची शक्यता नसल्याचा दावा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. शरद पवारांकडे राज्यसभेवर परतण्यासाठी आमदारांचे संख्याबळ नाही. त्यामुळे नजीकच्या भविष्यात एक मोठा तमाशा होईल, असे ते म्हणालेत. ओवेसी यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊन शरद पवार राज्यसभेवर जाणार का? असा प्रश्न चर्चिला जात आहे. महाराष्ट्रात सध्या मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांचा फड रंगला आहे. या निवडणुकीला राजकीय नेत्यांच्या प्रचारसभांमुळे अधिकच रंग चढला आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचीही एक सभा झाली. त्यात त्यांनी शरद पवारांच्या राज्यसभा सदस्यत्वावर भाष्य करून भविष्यात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे संकेत दिले. काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी? शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ मार्चमध्ये संपणार आहे. आता त्यांच्याकडे सत्ता कुठे आहे? त्यांच्या युतीकडे त्यांना राज्यसभेवर पाठवण्याएवढे खासदार कुठे आहेत? ते राज्यसभेवर कसे जाणार? हे त्यांना विचारले पाहिजे. त्यांना पुन्हा राज्यसभेवर जायचे असेल तर त्यांना आमदारांचे संख्याबळ लागेल ना? मग तुम्हाला कळेल. त्यासाठी जे काही होईल तो फक्त तमाशा होईल. यामुळे महापालिका निवडणुकांसह राज्यसभेच्या निवडणुकाही महत्त्वाच्या आहेत, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे पुढील काही महिन्यांत राज्यसभेवरील अनेक नेत्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. यात केंद्र सरकारमधील मंत्री व विविध पक्षांमधील प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे. हे मंत्री पुन्हा निवडून आले नाही तर त्यांचा कार्यकाळ पुन्हा सुरू ठेवणे कठीण होईल. विशेषतः इतर प्रमुख नेत्यांनाही अडचणींचा सामना करावा लागेल. ज्या प्रमुख नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, शरद पवार, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, बी एल वर्मा, जॉर्ज कुरियन यांचा समावेश आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, प्रेमचंद गुप्ता, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाह, प्रियंका चतुर्वेदी, रामदास आठवले, रामगोपाल यादव, नीरज शेखर, रा जी, शक्तीसिंह गोहिल, अभिषेक मनु सिंघवी, थंबी दुराई, तिरुची शिवा व सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचाही यात समावेश आहे. हे ही वाचा… परळी धनुभाऊंना दिली, मी माळाकोळी सांभाळेन:पंकजा मुंडे यांच्या विधानाची खमंग चर्चा; लोहा विधानसभा लढवणार का? असा सवाल मी परळी धनंजय मुंडे यांना देऊन टाकली. आता ते परळी सांभाळतात आणि मी माळाकोळी सांभाळेन, असे विधान भाजप नेत्या तथा राज्याच्या कॅबिनेट पंकजा मुंडे यांनी सोमवारी केले आहे. परळी विधानसभा मतदारसंघ हा पंकजा यांचा होता. पण सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी तो ताब्यात घेतला. त्यानंतर पंकजा यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेण्याचे सातत्याने प्रयत्न केले. पण आता त्यांनी चक्क परळी धनंजय मुंडेंना देऊन टाकल्याचे सूतोवाच केल्याने त्यांच्या विधानाची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वाचा सविस्तर
