राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचे ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांनी रान उठवले आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधला. “राज्याचे निवडणूक आयुक्त हे भाजपच्या कार्यकर्त्यासारखे वागत आहेत, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तर, भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय झाला आहे, असे म्हणत त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीवर भाष्य केले. सुरुवातीला बिनविरोध निवडींची चौकशी करण्याचे आश्वासन देणाऱ्या आयोगाने आता ‘यू-टर्न’ घेतल्याची टीका नाना पटोले यांनी केली. ६८ ते ७० जागांवर ज्या पद्धतीने बिनविरोध निवडणुका झाल्या, त्यामागे सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी दबाव आणल्याच्या चर्चेवरून, “विधीमंडळाची परंपरा जपण्यासाठी भाजपने तातडीने विधानसभा अध्यक्षांना बदलावे,” अशी मागणीही नाना पटोले यांनी केली. भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधी गट सक्रिय नाना पटोले यांनी भाजपमधील अंतर्गत वादावर मोठा गौप्यस्फोट केला आहे. “भाजपमध्ये सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक मोठा गट सक्रिय झाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या मनात काय चाललंय, हे मुख्यमंत्र्यांना चांगलंच ठाऊक आहे,” असे पटोले म्हणाले. भाजपमध्ये भविष्यात मोठा राजकीय स्फोट होईल आणि या सत्तासंघर्षाचे वाईट परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत, असा दावाही त्यांनी केला. कुणाला जर याचे वाईट परिणाम भोगावे लागत असतील तर ते शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत, असेही ते म्हणालेत. राणेंच्या संकेतांवरून भाजप नेत्यांवर निशाणा खासदार नारायण राणे यांनी दिलेल्या राजकीय निवृत्तीच्या संकेतांचे नाना पटोले यांनी स्वागत केले. “ज्येष्ठ नेत्यांनी राणेंचा आदर्श घ्यायला हवा,” असे म्हणत त्यांनी भाजपमधील इतर वरिष्ठ नेत्यांना नाव न घेता चिमटा काढला. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला तरी मी मोकळा आहे’ या विधानाचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, “हे विधान सूचक असून सरकार भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करत असल्याचे स्पष्ट होते”. कर्जावरील स्टँप ड्युटी माफी निवडणूक स्टंट राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जावरील स्टँप ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला नाना पटोले यांनी ‘निवडणूक स्टंट’ संबोधले. “निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही घोषणा आहे, ही कर्ज घेण्याची वेळ नाही, आधी घोषणा केली असती तर फायदा झाला असता,” असे नाना पटोले म्हणालेत. भाजपला केवळ सत्तेचा माज असून ते हिंदू-मुस्लिम आणि मराठी-हिंदी वादात लोकांना गुंतवून ठेवत आहेत,” अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
